ऑनलाईन टीम / पुणे :
भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या पुतळ्याचे अलीकडेच भारत यात्रा केंद्र, परंतवाडी, मावळ, पुणे येथे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा पुतळा भारत पदयात्रेच्या स्वयंसेवकांना वाहिलेला आहे. भारत यात्रा केंद्राचे विश्वस्त सुधींद्र भदोरिया, बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार अमर साबळे, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील आणि राज्यसभा खासदार नीरज शेखर हे या निमित्ताने उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी आणि डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकात सुधींद्र भदोरिया यांनी जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी आपली बहुप्रतीष्ठित भारत यात्रा कन्याकुमारीपासून सुरू केली त्या काळाची आठवण उपस्थितांना करून दिली. श्री. चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी आपल्या वडिलांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आणि माजी पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्वाची एक झलक उपस्थितांना दाखवली.
शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना चंद्रशेखर यांच्या भारतातील योगदानाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चंद्रशेखर यांची पदयात्रा अत्यंत खास होती आणि ती महात्मा गांधी तसेच विनोबा भावे यांच्या पदयात्रांसारखीच होती. कन्याकुमारी ते नवी दिल्लीपर्यंतचे अंतर पायी चालून विक्रमी सहा महिन्यांत पूर्ण करणारे अलीकडच्या काळातील ते पहिले राजकीय नेता होते.
लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी कन्याकुमारी ते नवी दिल्लीपर्यंतच्या चंद्रशेखर यांच्यासोबतच्या पदयात्रेत सहभागी झालेल्या भारत पदयात्रींचा सत्कार केला.