यशवंत सिन्हा, तर शत्रुघ्न सिन्हांकडून मोदींच्या राजीनाम्याची मागणी
पुणे / प्रतिनिधी :
नागरिकत्व नोंदणी, सुधारणा कायदा हा काळा कायदा असून तो मागे घ्यावा, ही मागणी घेवून गांधी शांती यात्रा आम्ही सुरू केली आहे. संविधान रक्षण करणे, एकतेचा संदेश देणे आणि गांधीजींना पुन्हा मरू न देणे, हा हेतू त्यामागे आहे, असे मत ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. विद्यापीठात सरकारपुरस्कृत हिंसाचार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते राजघाट (दिल्ली) या मार्गावर सुरू झालेली गांधी शांती यात्रा गुरुवारी सायंकाळी पुण्यात आली. येथे डॉ कुमार सप्तषी, अन्वर राजन, शिवाजीराव कदम, अभय छाजेड यांनी स्वागत केले. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत यशवंत सिन्हा बोलत होते. या पत्रकार परिषदेत अभिनेते, नेते शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ. कुमार सप्तषी, आशिष देशमुख उपस्थित होते.
यशवंत सिन्हा म्हणाले, गांधीजींच्या विचारांच्या विरोधात काम सुरू आहे. नागरिकता कायदा काळा आणि विभाजनवादी कायदा संसदेत नागरिकत्व कायदा मागे घ्या, ही मागणी आहे. एनआरसी लागू करणार, घुसखोरांना हाकलणार, हे गृहमंत्र्यांचे शब्द होते. भय निर्माण झाले आहे. सरकार याला धार्मिक रंग देऊ पाहत आहे. सरकारपुरस्कृत हिंसा विद्यापीठात होत आहे. या दोषींवर कारवाई झाली पाहिजे.राजघाटवर 30 जानेवारीला सर्व समाजातील घटक एकत्र येऊ. यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. देशाची जनता आजही गांधींजींसमवेत आहे. संविधान रक्षणाची शपथ गेट वे ऑफ इंडियावर आम्ही घेतली. शांती, एकतेचे संदेश घेऊन आम्ही यात्रेवर आहोत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाविरुद्ध काम सध्या चालू आहे. शांतता धोक्यात आणली जात आहे. देशाला याची किंमत मोजावी लागत आहे. छुपा अजेंडा पुढे आणला जात आहे. गांधींचा विचार मारण्याचे कारस्थान चालू आहे. राजकीय विचारांच्या पुढे जाऊन संविधान विचाराची लढाई लढण्याची गरज आहे.’
अहंकारामुळे देशातील स्थिती बिघडली
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, देशाची युवा शक्ती आज अशांत आहे. पुन्हा जयप्रकाश नारायण यांची चळवळ सुरू असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. काही लोकांच्या अहंकारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी विश्वासार्हता गमावली आहे, राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या भाषणात अभिनय आहे, पोकळपण आहे. ते बोलतात एक, करतात भलतेच. सर्वधर्मीय आज एकत्रपणे संविधान रक्षणासाठी आंदोलनात उतरले आहेत. अमित शहा म्हणजे मॅन फ्रायडे आहे. केंद्र सरकार मदमस्त हत्ती आहे. नोटाबंदी हा तुघलकी फतवा होता. त्याने देशाला प्रचंड झटका बसला, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.