शासकीय इमारतींच्या माहिती संकलनाचे काम सुरू
वार्ताहर / सावंतवाडी:
3 मेनंतर लॉकडाऊन उठवल्यास अथवा काही भागात नियम शिथील केल्यास मुंबई, पुणे, गोवा आदी भागातून चाकरमानी किती येणार व आपल्या जिल्हय़ात तालुकानिहाय झारखंड, उत्तरप्रदेश, कर्नाटक, दिल्ली भागातील कामगार किती आहेत, गावी किती जाणार याची माहिती गावागावात संकलित करण्यात येत आहे. परप्रांतीय कामगारांनी आपल्याला गावी पाठवा, असे स्पष्ट केले आहे. तर मुंबई-पुणे चाकरमान्यांची ई-पासद्वारे गावी येण्यासाठी मागणी मोठय़ा प्रमाणात आहे. या चाकरमान्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यासाठी गावागावातील शासकीय इमारतींची माहिती मागविण्यात आली आहे.
सावंतवाडी, कुडाळ भागात गटविकास अधिकारी यांनी सर्व गावांच्या सरपंचांना माहिती तात्काळ देण्याबाबत फर्मान काढले आहे. सद्यस्थितीत चाकरमान्यांना स्वीकारायचे की गावकऱयांच्या रोषाला सामोरे जायचे या कचाटय़ात सरपंच अडकले आहेत. जिल्हा सरपंच संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी जिल्हा परिषदेकडे याबाबत मार्गदर्शन मागितले आहे. लॉकडाऊनच्या वाढत्या काळामुळे हैराण झालेले गावी येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना गावात घ्यायचे की नाही यावरून दोन प्रवाह आहेत. सध्या गावात वाद सुरू झाले आहेत. येत्या आठ दिवसानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोनामुक्त जिल्हा राहण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्हय़ात तालुकानिहाय गावागावात प्रांताधिकारी, तहसीलदारांकरवी माहिती संकलित करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांनी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना केल्या आहेत. यानुसार गावागावात परप्रांतीय कामगार किती आहेत ते गावी जायला तयार आहेत का? यामध्ये सावंतवाडीत झारखंड, उत्तरप्रदेश, विजापूर, कर्नाटक भागातील हजारो कामगार गावी जाण्यास तयार आहेत, असे स्पष्ट केले.
मुंबई-पुणे चाकरमानी किती येणार?
मुंबई-पुणे येथील काही चाकरमान्यांनी ई-पासद्वारे गावी येण्याची परवानगी घेतली आहे. त्यात शासनाने जे चाकरमानी, कामगार आपल्या गावी येणार आहेत त्यांनी स्वखर्चाने गावी यायचे आहे. तसेच 14 दिवस होमक्वारंटाईन रहायचे आहे. या काळात जेवणाची व अन्य सोय त्यांनीच करायची आहे. या अटीनुसार त्यांना गावी येण्यास दिले जाणार आहे. यानुसार मोठय़ा प्रमाणात चाकरमान्यांनी होकार दर्शविला आहे. त्यामुळे गावच्या सरपंचांसमोर यक्षप्रश्न आहे. गावकऱयांना व चाकरमान्यांना सांभाळायचे कसे, या विवंचनेत आहेत.
जिल्हा प्रशासनाने चाकरमानी गावात आल्यास अंगणवाडी, शाळा, शासकीय इमारतीत त्यांना 14 दिवस राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार गावात परदेशी व मुंबई-पुणे व अन्य भागातील किती लोक येणार याचा अहवाल मागितला आहे.
प्रेमानंद देसाई यांनी स्पष्ट केले, चाकरमानी हे आमचे भाऊबंद आहेत. त्यांची मुंबई-पुणे व अन्य भागात फारच अडचण असेल त्यांनीच गावी यावे. ज्यांची मुंबई-पुण्यामध्ये सोय आहे अशांनी मजा करण्यासाठी येऊ नये. ज्यांना खरीच अडचण आहे, त्यांनीच यावे. त्यांची योग्य व्यवस्था करू. पण, चाकरमान्यांनी गावाचा व स्वत:चा विचार करावा, त्यांनी मार्ग काढावा. गावी यायचे की तेथे रहायचे ते. कोरोनामुक्त झाल्यावर निश्चित गावी दिमाखात स्वागत करू, असे स्पष्ट केले. सरपंच, ग्रामसेवकांकडूनही माहिती घेण्यात येत आहे.
सांगेली सावरवाड नवोदयमध्ये
21 राजस्थानचे अडकले
सांगली नवोदय विद्यालयात राजस्थानमधील 21 जण आहेत. सात मुली व चौदा मुलगे येथे अडकले आहेत. त्यांना गावाला जायची आस लागली आहे. मात्र, नवोदयमध्ये ते सुरक्षित आहेत, असे सांगण्यात आले.