प्रतिनिधी/ गुहागर
मुंबई-पुण्यातील चाकमानी हे आपलेच भाऊबंद आहेत. यामुळे त्यांना आपल्या मुळगावी येण्यास गावातील मंडळींनी रोखण्यापेक्षा त्यांच्यासाठी सुरक्षितता बाळगून स्वतंत्र व्यवस्था करणे हे प्रत्येक गाववाल्याचे कर्तव्य आहे. यामुळेच गुहागर तालुक्यातील पालपेणे गावामध्ये तब्बल 90 घरे खाली करून 446जणांचे घरामध्ये, तर 17जणांचे शाळांमध्ये क्वारंटाईन करून चाकमान्यांचे स्वागत करण्यात आले आहे.
पालपेणे येथील उमेश खैर व गावातील प्रमुख मंडळींनी सर्वप्रथम तहसीलदारांची भेट घेऊन आपल्या गावात येणाऱया सर्व चाकरमानी बांधवांची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी स्विकारली. यासाठी मुंबई व पुण्यातील येणाऱया चाकरमान्यांची आकडेवारी घेतली. गावात एकाबाजुला परंतु वाडीतच असलेल्या घरांची निवड केली. घरातील एक-दोन मंडळींना दुसऱया घरामध्ये नेण्यात आले. अशी 90 घरांची व्यवस्था केली. गावातील मंडळींनी गावातील शाळा, हायस्कूल स्वच्छ करून ठेवली. ज्या घरात चाकरमानी वास्तव्यास येणार आहेत त्या घरात त्यांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून दिली.
यामुळे चाकरमानी सध्या स्वतः घरी जेवण तयार करत आहेत, परंतु ज्यांना जेवण बनवण्याचा अडथळा होता. त्यांना कॅटरिंगमार्फत युज अँड थ्रो स्वरूपाच्या कंटेनर उपलब्ध करून त्यांना जे लागेल ते सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून, येथील स्वयंसेवक आणि ग्रामकृती दल यांच्यामार्फत त्यांच्या सर्व गरजांची पूर्तता करत आहेत. पंचक्रोशीतील गावांनाही जीवनावश्यक सामग्री तेथील स्वयंसेवकांमार्फत पुरवावी यासाठी विनंती केली. यामुळे आपल्या माणसांना ज्यांना अडचण आहे त्यांना गावी बोलवून त्यांची व्यवस्था करणाऱया या गावाचा आज इतर गावही आदर्श घेत आहेत. यामध्ये मोलाचे योगदान येथील शासकीय अधिकारी, आरोग्यसेवक, स्वयंसेवक व ग्रामस्थांचे लाभत आहे.
आज कोरोनाचे भीषण संकट संपूर्ण जगावर आहे. या परिस्थितीत आपल्या माणसांना मानसिक आधाराची गरज आहे. एकीकडे काहीठिकाणी अनेक गावांत चाकरमान्यासाठी गावच्या वेशी बंद झाल्याच्या घटना ऐकिवात आहेत, तर दुसरीकडे आपल्या लोकांची मनापासून सेवा करणारे हे गाव आज इतर गावांसाठी आदर्श बनले आहे.