क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष निक हॉकली यांची स्पष्टोक्ती
मेलबर्न / वृत्तसंस्था
सध्या आयपीएल खेळत असलेल्या खेळाडूंना ही स्पर्धा संपल्यानंतर खास चार्टर विमानाने मायदेशी परत आणण्याचा आपला कोणताही विचार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष निक हॉकली यांनी सोमवारी स्पष्ट केले. आपल्या खेळाडूंना बायो-बबल सुरक्षित वाटत आहे. त्यामुळे, मला त्यांची फारशी चिंता वाटत नाही, असे हॉकली म्हणाले. मात्र, त्यांची ही प्रतिक्रिया केकेआरचे दोन खेळाडू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होण्यापूर्वी घेतली गेली होती.
वरुण चक्रवर्ती व संदीप वॉरियर हे केकेआरचे दोन खेळाडू पॉझिटिव्ह आले असून ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्स हा याच संघातील सदस्य आहे. दि. 30 मे रोजी आयपीएल स्पर्धा संपन्न झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चार्टर फ्लाईट उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती मुंबई इंडियन्स संघातील फलंदाज ख्रिस लिनने यापूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हॉकली बोलत होते.
‘आम्ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेशी सातत्याने संपर्कात आहोत. खेळाडूंशी व बीसीसीआयशी संपर्कात राहण्याचाही आमचा प्रयत्न आहे. सर्व खेळाडू ठीक आहेत, याची सातत्याने खातरजमा करुन घेतली जात आहे’, असे हॉकली यावेळी म्हणाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सर्व खेळाडूंना सुरक्षितरित्या मायदेशी पोहोचवले जाईल, अशी हमी दिली आहे. त्यामुळे, आम्ही निश्ंिचत आहोत, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला. ‘दि. 30 मे पर्यंत आयपीएल संपणार नाही. त्यामुळे, सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहणे, हा एकमेव पर्याय आहे’, असेही ते म्हणाले. ऑस्ट्रेलियन प्रशासनाने अलीकडेच भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱया प्रवाशांवर बंदी घातली असून भारतात आलेल्या दुसऱया लाटेत सध्या रोज असंख्य बळी जात आहेत. ऑस्ट्रेलियाचे ऍडम झाम्पा, ऍन्डय़्रू टाय व केन रिचर्डसन हे देखील आयपीएल स्पर्धेत समाविष्ट होते. पण, त्यांनी सदर बंदी लादली जाण्यापूर्वी मायदेशी रवाना होणे पसंत केले. आताही ऑस्ट्रेलियाचे अनेक आजी-माजी खेळाडू या स्पर्धेत अनेक जबाबदाऱया सांभाळत आहेत. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल व स्टीव्ह स्मिथ हे काही प्रँचायझींतर्फे खेळत आहेत तर रिकी पाँटिंग, कॅटिच प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत