प्रतिनिधी/ चिपळूण
शहरातील अतिक्रमणावर नगर परिषद शुक्रवारी कारवाई करीत असताना मोठा वादंग झाला. एका व्यावसायिकाने कर्मचाऱयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने चाकू व काठी उगारल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र या प्रकारानंतर अन्य व्यावसायिक पळून गेले. या प्रकरणी प्रशासन पोलिसांकडे तक्रार अर्ज देणार असल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहराला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद ही त्याची मुख्य कारणे आहेत. सुरूवातीपासूनच नगर परिषदेने कोणतीही कारवाई न केल्याने आज मुख्य दुकाने कमी व अतिक्रमण अधिक असे चित्र शहरात पहायला मिळते. गुहागर नाका, मच्छीमार्केट, बाजारपूल, रंगोबा साबळे रोड, चिंचनाका, भोगाळे, मार्पंडी, बहादूरशेखनाका, महामार्ग, पॉवरहाऊस या मुख्य भागांसह बाजारपेठेत व्यावसायिकांनी मोठय़ा प्रमाणात रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे आता शहरातून वाहने चालवणे सोडाच, नागरिकांना साधे चालणेही कठीण बनले आहे. याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद बांधकाम विभाग व अन्य अधिकारी, कर्मचाऱयांच्या पथकाने शहरात रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अधूनमधून ही कारवाई केली जात आहे. मात्र ती करताना दुजाभाव होत असून बडय़ांना अभय तर गरीबांना त्रास दिला जात असल्याचा समज व्यावसायिकांचा झाला आहे. यातून कारवाई करणाऱया कर्मचाऱयांना लहान व्यावसायिकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण करू नका, अशी समज दिली जात आहे.
शुक्रवारी नगर परिषद समोरच अतिक्रमणावर कारवाई करीत असताना व्यावसायिकाचा पारा चढला. त्याने कारवाई करण्यास नकार दिला. त्यामुळे कर्मचाऱयांनी त्याला कायदा सांगितला. यातून वाद विकोपाला गेला व त्याने चाकू, काठी हातात घेऊन एका कर्मचाऱयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे गोधळ उडाला. त्यानंतर नगर परिषदेच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी जाऊन या वादावर पडदा टाकला. या वादाची शहरात चर्चा होताच अन्य व्यावसायिक मात्र दिवसभर पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्या जागी वाहनांचे पार्किंग दिसत होते.
पानगल्लीवरील कृपा आशीर्वाद कायम
शहराचा विचार करता सर्वाधिक अतिक्रमण हे पानगल्लीत आहे. सध्यातर अनेक भाजीसह अन्य व्यवसाय करणाऱयांनी आपले ट्रे अगदी अर्ध्या रस्त्यातच मांडले आहेत. तसेच ऊनापासून संरक्षण करण्यासाठी आपली छप्परेही मोठी केली आहेत. असे असताना नेहमीप्रमाणे पानगल्लीतील कोणत्याही व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाचा त्यांना आशीर्वाद का, असा सवालही उपस्थित होत आहे.
पोलिसात तक्रार अर्ज देणार
या बाबत नगर परिषदेच्या एका अधिकाऱयाशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर वादावादीचा प्रकार घडला. व्यावसायिकाने काठीही काढली. मात्र तो मिटवण्यात आला आहे. तरीही भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना तक्रार अर्ज देणार असल्याचे त्याने सांगितले.