2021 पर्यंत चीनी मालाची आयात दीड लाख कोटीपर्यंत कमी करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात वाढलेल्या कोरोनाच्या फैलावामुळे सर्वत्र व्यवहार ठप्प झाले होते. आता उद्योग, कारखाने पुन्हा सुरू झाले असून चीनी मालावरील बहिष्काराचा आवाज आता भारतात जोर पकडू लागल्याने ही संधी साधत आता भारतीय उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या घोषणेनंतर भारतीय बाजारात विदेशी उत्पादनांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. अनेक भारतीय उद्योजकांनी आता भारतीय उत्पादनांच्या निर्माण कार्यात उडी घेण्याची तयारी दर्शवली आहे. कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या संदर्भात 10 जूनपासून एक मोठं अभियान चालवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिनी मालावर बहिष्कार घालण्याच्या मोहिमेचा भाग हे नवे अभियान असेल असे सांगितले जात आहे. याअंतर्गत 7 कोटीहून अधिक व्यापारी सध्याचा विदेशी उत्पादनांचा स्टॉक संपल्यानंतर नवा स्टॉक आयात करणार नाहीत, अशीही तयारी केली असल्याचे समजते. सीएआयटीने चीनमधून येणाऱया अशा 3000 वस्तुंची यादी तयार केली आहे. ज्यात साबण, टूथपेस्ट, होम अप्लायन्स, खेळणी आदी वस्तुंचा समावेश आहे. डिसेंबर 2021 पर्यंत चीनी मालाची आयात दीड लाख कोटीपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट सीएआयटी (केट)ने समोर ठेवले आहे.
बडय़ा उद्योगपतींना काय वाटतं?
इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, एफएमसीजी गटात भारतीय उत्पादने बाजारात नाही आहेत. या गटात जी विदेशी उत्पादने आहेत ती भारतातच तयार केली जातात. ज्यांना मागणी बाजारात अधिक आहे. त्यामुळे एखाद्या उत्पादनावर संपूर्णपणे बहिष्कार घालणं तसं अवघड असल्याचे मत बडय़ा उद्योगपतींनी व्यक्त केलं आहे.