वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात रशियात सुरू होणाऱया युद्धाभ्यासात स्वतःची सैन्यतुकडी पाठविण्यास भारताने नकार दिला आहे. बहुराष्ट्रीय कावकाज युद्धाभ्यासात पाकिस्तान आणि चीनचे सैन्य सामील असणार आहे. या दोन्ही देशांच्या सैन्यासोब सीमेवर आमचा तणाव सुरू आहे. अशा स्थितीत या देशांसोबत युद्धाभ्यास करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे भारताने रशियाला ठणकावून सांगितले आहे.
दक्षिण रशियाला अस्त्राखन भागात 15 ते 26 सप्टेंबरपर्यंत चालणाऱया या मेगा वॉरगेममध्ये भारतीय सैन्यातील सुमारे 150, वायुदलातील 45 आणि नौदलाचे काही अधिकारी सहभागी होणार होते.
साउथ ब्लॉकमध्ये अलिकडेच एक बैठक पार पडली होती. या बैठकीत विदेशमंत्री एस. जयशंकर, सरसेनापती बिपिन रावत आणि अन्य वरिष्ठ अधिकारी सामील होते. या बैठकीत युद्धाभ्यासासाठी रशियाकडून पाठविण्यात आलेले निमंत्रण न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युद्धाभ्यासात सामील होण्यासाठी इन्प्रंटी बटालियन पाठविण्याची यापूर्वी तयारी केली जात होती. परंतु सद्यस्थिती पाहता चीनसोबत युद्धाभ्यास न करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. याच कारणामुळे रशियात आयोजित होणाऱया वॉरगेममध्ये भारतीय सैन्य सामील होणार नाही. चीनसोबत युद्धाभ्यास केल्यास जागतिक पातळीवर चुकीचा संदेश देण्याची शक्यता होती.
15 जून रोजी गलवान खोऱयात भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत अनेक भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. तर चीनचेही 40 पेक्षा अधिक सैनिक ठार झाले होते. तेव्हापासून लडाख येथील सीमेवर तणावाची स्थिती आहे.
रशियातील युद्धाभ्यासात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांसह (भारत सोडून) चीन, पाकिस्तान, कजाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उज्बेकिस्तानसह 11 देश सामील होणार होते. अन्य देशांमध्ये मंगोलिया, सीरिया, इराण, इजिप्त, बेलारुस, तुर्कस्तान, आर्मेनिया, अबकाजिया, दक्षिण ओसेतिया, अजरबैजानन आणि तुर्कमेनिस्तान यांचा समावश आहे.