खेडच्या विराट सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा टोला
प्रतिनिधी/ खेड
देशाची अर्थव्यवस्था बिघडवण्याचे काम मोदी सरकारने केले असून राज्य सरकार विकासाच्या जराही लायकीचे नाही. स्वातंत्र्य लढ्याशी काडीमात्र संबंध नसणारे आज सत्तेवर असल्याची टीका करत चोरलेले धनुष्यबाण गद्दारांना पेलवणार नाही, असा टोला ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. ज्यांना मोठे केले तेच आज खोक्यात बंदिस्त झाले असून हिंमत असेल तर माझ्या वडिलांचे नाव बाजूला ठेवून निवडणूक लढवून दाखवा, असा गर्भित इशाराही दिला.
निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व चिन्ह गोठवल्यानंतर महाडनाका येथील गोळीबार मैदानात रविवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांची विराट सभा झाली. या सभेत भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व निवडणूक आयोगावर त्यांनी टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मिंदे तर निवडणूक आयोगाचा ‘चुना लगाव’ असा उल्लेख करत निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झाला नसेल तर गोळीबार मैदानात येऊन खरी शिवसेना कुणाची आहे, हे पहावे असा हल्लाबोलही चढवला. निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नसल्याचेही ठणकावले. ते म्हणाले, शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली असून निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी केलेली नाही. यामुळे निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करण्याचा प्रयत्न करू नये. निवडणूक आयोगाने ठाकरे गटावर जो अन्याय करायचा होता, तो त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाचे चिन्ह बदलले असले तरी अंधेरीचा गड राखला, असेही ठणकावून सांगितले. भाजपसह गद्दार शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत असून मराठी माणसाच्या एकजुटीवरच घाव घालत आहेत, असा आरोपही केला.