पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित केले. सध्या उत्तर भारतासह देशाच्या बहुतांश भागात सुरू असलेल्या छठ पूजेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच गेल्या आठवडय़ात भारतीय अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) 36 उपग्रहांसह केलेल्या यशस्वी उड्डाणांचे कौतुकही केले.
पंतप्रधान मोदींनी रविवारी ‘मन की बात’च्या 94 व्या भागाला शुभेच्छा संदेश देऊन सुरुवात केली. त्यांनी छठपूजा आणि सूर्यपूजेचे महत्त्वही देशवासियांना सांगितले. आज देशाच्या अनेक भागांमध्ये सूर्य उपासनेचा सर्वात मोठा सण ‘छठ पूजा’ साजरा केला जातो. आपल्या कुटुंबीयांसोबत अनेकजण मोठय़ा उत्साहात छठ उत्सव साजरा करतात. मी प्रार्थना करतो की, छठ देवी सर्वांना समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद देईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सूर्यपूजेची परंपरा ही आपली संस्कृती, आपली श्रद्धा निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे याचा पुरावा असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे चढ-उतार हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचा संदेशही या पूजेच्या माध्यमातून दिला जातो, असे पंतप्रधानांनी सांगितले. याप्रसंगी सौरऊर्जेची काही उदाहरणे देत पंतप्रधानांनी त्याचे महत्त्वही विषद केले.
अंतराळ क्षेत्रात भारताला नव्या संधी
भारत आता आपले पारंपरिक अनुभव आधुनिक विज्ञानात प्रक्षेपित करतानाच सर्वात मोठय़ा ऊर्जा उत्पादकांपैकी एक बनला आहे. इस्रोने अलीकडेच केलेल्या व्यावसायिक उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, एक काळ असा होता जेव्हा भारताला इतर विकसित राष्ट्रांनी क्रायोजेनिक तंत्रज्ञान नाकारले होते. परंतु भारतीय शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान स्वदेशी विकसित केले आणि आता कित्येक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. इस्रोने 36 उपग्रहांसह केलेल्या यशस्वी प्रक्षेपणामुळे जागतिक व्यावसायिक बाजारपेठेत भारत एक मजबूत देश म्हणून उदयास आला आहे. तसेच अंतराळ क्षेत्रात भारतासाठी नवीन संधी खुल्या झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वी भारतातील अंतराळ क्षेत्र सरकारी यंत्रणेच्या कक्षेत मर्यादित होते. आता मात्र अंतराळ क्षेत्र तरुणांसह भारताच्या खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले. या बदलानंतर त्यात क्रांतिकारी बदल घडू लागले आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
सरदार पटेल यांची आठवण
पीएम मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवषी 31 ऑक्टोबर रोजी साजऱया होणाऱया राष्ट्रीय एकता दिवसाची प्रेक्षकांना आठवण करून दिली. पंतप्रधानांनी ‘मिशन लाईफ’ मोहिमेबद्दल देखील सांगितले. या मोहिमेचे उद्दिष्ट पर्यावरणाचे रक्षण करणे आहे. या मोहिमेबद्दल देशवासियांनी अधिक माहिती जाणून घेत त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.