श्रमिक कष्टकरी संघटनेचे प्रमुख संपत देसाई यांचे प्रतिपादन, खानापुरात श्रमिक व कष्टकरी शेतकऱयांची बैठक
खानापूर /वार्ताहर
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. पण स्वातंत्र्याच्या हिरकमहोत्सवी वर्षांतही श्रमिक व कष्टकरी शेतकरी वर्ग आजही आपल्या हक्कापासून वंचित आहे. गेल्या अनेक वर्षापासून पोटाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी वनखात्याच्या अखत्यारित जमिनीत उपजीविका करणारा श्रमिक शेतकरी तसेच धनगर समाज आजही दुर्लक्षित आहे. अशा श्रमिक लोकांना आपल्या जंगल जमिनीसाठी संघर्ष करावा लागतो. ही चिंतनीय बाब आहे. पण आता एकजुटीने आपल्या हक्काच्या मागणीसाठी लढणारी ही एकप्रकारची नव्या स्वातंत्र्याची लढाई आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी केले. ते खानापूर येथील शिवस्मारकात धनगर गवळी आणि शेतकऱयांच्या वन जमिनीच्या हक्कांबाबत झालेल्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी वनहक्क संघर्ष समितीचे निमंत्रक महादेव मरगाळे, अभिजित सरदेसाई, नरेंद्र पाटील, रणजित कालेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, या देशात ब्रिटिश आले. त्यांनी अनेक कायदे केले. वनकायदा करून जंगले ताब्यात घेतली. प्रचंड प्रमाणात इथल्या जंगलांची लूट केली. स्वातंत्र्यानंतर तोच कायदा अनेक वर्षे इथल्या सरकारांनी राबविला. ज्यांनी जंगले जपली, जोपासली, त्यांच्यासोबत दोस्ती केली. अशा आदिवासी, धनगर, गवळी, शेतकरी यांनाच वनकायद्याने अतिक्रमित ठरविले. मुळात कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीपासून आमचा इथे अधिवास असताना आम्हालाच हद्दपार करण्याचा विचार सुरू झाला. जंगल आमच्या हक्काचे… अशी ठाम भूमिका घेत देशभरात आदिवासींसह इतर वनानिवासी जनतेने 30/40 वर्षे संघर्ष केला. त्यातून वनहक्काचा कायदा अस्तित्त्वात आला. आता या कायद्याची अंमलबजावणी करायलाही हे प्रशासन टाळाटाळ करीत आहे. म्हणूनच ही आपल्या हक्काची म्हणजे खऱया स्वातंत्र्याची लढाई आहे. ही लढाई आपल्याला संघटितपणे लढावी लागेल. शेवटच्या माणसाला हक्क मिळाल्याशिवाय आता थांबायचे नाही, असा निर्धार करून दसऱयानंतर ही लढाई नव्या जोमाने सुरू करूया, असे आवाहन त्यांनी केले.
अभिजित सरदेसाई म्हणाले, आपण सर्वांनी ही लढाई राजकारणविरहित एकत्र येत चालू ठेवूया. गरज पडेल तिथे आंदोलनाचा मार्ग धरूया आणि हाती घेतलेला प्रश्न शेवटाला नेऊया.
सुरुवातीला महादेव मरगाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून या मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. वनजमिनीची लढाई आपल्याला आता उभी करून इथल्या जंगल जमिनी व जंगलावरचा हक्क मिळवूया, असे सांगितले.
यावेळी खानापूर तालुक्मयातील गवळी धनगर, शेतकरी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते. याप्रसंगी झालेल्या चर्चेत विठू अवने, काशिनाथ कुलम, विठू जंगले, महादेव मुतगेकर, परशुराम गावडे, नवलू अवने, साजन पाटील, विठू शिंदे, परशराम गवाळकर, शशिकांत पाटील, नामदेव पाटील, बाबू जंगले, जयवंत पाटील, रत्नाकर सुतार, इत्यादीनी सहभाग घेतला. याप्रसंगी अनेक पिढय़ा जंगल भागातील जमिनी वहिवाटी खाली असणारे शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते..