ऑनलाईन टीम / पाटणा :
नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीत जनतेने एनडीएच्या बाजूने कौल दिला आहे. या निवडणुकीत चर्चेत असलेले आरजेडीचे तरूण नेते तेजस्वी यादव यांनी बिहार निवडणुकांच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी बिहारच्या जनतेचे आभारही मानले आहेत.
बिहार निवडणुकांच्या निकालासंदर्भात बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, जनतेचा आदेश महागठबंधनाच्याच बाजूने होता. परंतु, निवडणूक आयोगाचा निकाल मात्र एनडीएच्या बाजून आला आहे. हे असे पहिल्यांदाच नाही होत आहे. 2015 मध्ये जेव्हा महागठबंधन झाले होते. तेव्हा देखील मते आमच्याच बाजूने होती. परंतु, भाजपने सत्ता मिळवण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला.
आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी आरोप लावला आहे की, आम्हाला लोकांचे समर्थन मिळाले, पण एनडीएने पैसे, भीती आणि बळाच्या जोरावर निवडणुकीत विजय मिळवला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, नीतिश कुमार यांचा जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर त्यांच्यात थोडीशी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा लोभ सोडायला हवा. तसेच पोस्टल मतांची पुन्हा एकदा मतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी देखील तेजस्वी यादव यांनी निवडणुक आयोगाकडे मागणी केली आहे.