प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखला विभागातील नेटवर्क बंद होण्याचा प्रकार गेल्या 15 दिवसांपासून सुरूच आहे. परिणामी नागरिकांना वेळेत दाखले मिळणे कठीण झाले आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना महापालिका कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. त्यामुळे नेटवर्कच्या समस्येचे निवारण कधी होणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
जन्म-मृत्यू दाखल्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. पण यामुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोय अधिक झाली आहे. दर चार दिवसांनी सर्व्हर डाऊनचा आणि नेटवर्क बंदचा फटका बसत असल्याने वेळेत दाखले मिळत नसल्याची तक्रार होत आहे. जन्म-मृत्यू दाखले घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिक महापालिकेकडे अर्ज करीत असतात. पण नागरिकांना आज या, उद्या या, असे सांगण्यात येत असल्याने धावपळ करावी लागत आहे. सर्व्हर डाऊनमुळे दाखले वेळेवर मिळत नाहीत. नेटवर्कदेखील व्यवस्थित नसते. त्यामुळे याबाबत जन्म-मृत्यू दाखले वितरण विभागातील कर्मचाऱयांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन नेटवर्कसाठी नवीन जोडणी करण्यात आली आहे. पण 15 दिवसांपूर्वी नवीन नेटवर्क कनेक्शनची जोडणी करूनही नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. 15 दिवसांपासून नेटवर्कचा खेळखंडोबा सुरू असून, नागरिकांना दाखले मिळणे दुरापास्त बनले आहे.
दाखले वेळेत मिळत नसल्याने वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वादावादीचे प्रसंग रोखण्यासाठी दाखले वितरण विभागातील कर्मचाऱयांनी मोबाईल नेटद्वारे दाखले देण्यास प्रारंभ केला आहे. पण दररोज शेकडो दाखले काढावे लागत असल्याने कर्मचाऱयांचे मोबाईल नेटवर्क अपुरे पडत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्येबाबत मनपाच्या आयटी विभागात तसेच आयुक्तांकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिका आयुक्तांनी या समस्येकडे लक्ष देऊन नेटवर्क समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.