मेळाव्यात 256 जणांनी केली नोंद : आमदार सिद्दू सवदी यांच्यासह स्वामीजींची उपस्थिती
वार्ताहर /जमखंडी
अनेक प्रकारच्या कठीण प्रसंगाचा सामना करून दलित वर्गाला व महिलांना शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाई व जोतिबा फुले यांनी केले असून राष्ट्रनायक असलेल्यांची प्रेरणा घेऊन येथील माळी समाजाने वधू-वर मेळाव्याचे आयोजन करून त्यात विधवा, विधूर, घटस्फोटीत यांना संधी देऊन प्रशंसनीय कार्य हाती घेतले आहे, असे प्रतिपादन कर्नाटक हातमाग अभिवृद्धी निगमचे अध्यक्ष, तेरदाळचे आमदार सिद्दू सवदी यांनी केले. जमखंडीत बसव भवनमध्ये अखिल कर्नाटक माळी समाजसेवा संघ व जमखंडी तालुका समस्त माळी समाजाच्या सहकार्याने राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन करून ते बोलत होते.
कुत्तीनकंती मठाचे श्री शिवलिंग पंडिताराध्य महास्वामी, शेगुणशीचे श्री महांतदेवरु, नागराळ परमानंद आश्रमाचे श्री ज्ञानेश्वर महास्वामी यांच्या सान्निध्यात, सांगली जिल्हा माळी समाजसेवा संघाचे अध्यक्ष विजयराव धुळबूळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वधू-वर मेळाव्याच्या उद्घाटन समारंभास माजी आमदार जी. एस. न्यामगौड, श्रीकांत कुलकर्णी, संगमेश निराणी, अथणीचे सदाशिव बुटाळे, बसवराज न्यामगौड, कंत्राटदार काशिनाथ कंकाळे, काशप्पा बालकिले, शंकर किवटी, ईश्वरप्पा बेळ्ळुंडगी, संगमनाथ हुगार, गुरुपाद मेडिगेरी, सिद्दाप्पा मेंडिगेरी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. व्ही. एस. माळी, डॉ. अशोक नरोडे यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षणात फुले दाम्पत्याची क्रांती
महिलांना शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले असून समाजाला कुंपण न घालता आपण सर्व एक आहोत, हे दाखवून द्या, असा उपदेश श्री ज्ञानेश्वर महास्वामींनी केला. भारतात अनेक क्रांती झाल्या असून शिक्षणात फुले दाम्पत्यांनी क्रांती केल्याचे प्रतिपादन श्री महांतदेवरु यांनी केले. गरीब कुटुंबातील प्रतिभावंत विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित होऊ नयेत याकरिता साहाय्य करण्याकरिता प्रसंगी झोळी घेऊन मदत गोळा करण्यास तयार असल्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. हृदय श्रीमंत असलेल्या या समाजाची देश उभारणीत मुख्य भूमिका असल्याचा विचार श्री शिवलिंग महास्वामीनी व्यक्त केला.
वधू-वर मेळाव्यात 256 जणांनी नोंद करून आपला परिचय करून दिला. लक्ष्मी माळीच्या प्रार्थना गीताने समारंभाची सुरुवात झाली. सी. आर. बेळगली यांनी स्वागत केले. राज्य माळी समाज सेवा संघाचे अध्यक्ष काडू माळी यांनी प्रास्ताविक करून या समाजाचा 2 ए वर्गात समावेश करण्याची मागणी केली. नागेश मालगार यांनी सूत्रसंचालन तर एम. पी. तानाप्पगोळ यांनी आभार मानले.