वार्ताहर/ गणपतीपुळे, खंडाळा
जयगड ते निवळी जयगड मार्गावरील अवजड वाहने मोठ-मोठे खड्डे, वाहनांची अमर्यादित गती यावर आरटीओ, बांधकाम विभाग, मेरिटाईम बोर्ड यांसहित दोन्ही कंपन्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यात दर्शिल सावंत या बालकाचा अवजड वाहतुकीमुळे बळी गेला आहे. जोपर्यंत चार पदरी रस्ता, साईडपट्टी, रस्त्याचे डांबरीकरण, वाहनांची वेगमर्यादा यांची अमलबजावणी होत नाही, तोपर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद व्हावी ठेवण्याची आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे.
बुधवार 15 डिसेंबर रोजी दर्शिल प्रमोद सावंत याचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. रात्री वाहनचालक चंदन कुमार सिद्धू बिंद (33, उत्तरप्रदेश) याला अटक केली गेली. बालकाच्या मृतदेहावर पोलीस बंदोबस्तात भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारीही या मार्गावरील अवजड वाहतुक बंदच आहे. या अपघातासंदर्भात कंपन्यांचे अधिकारी व संबंधित खात्याच्या अधिकाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अवजड वाहतुकीच्या दर्जाचा चारपदरी रस्ता होईपर्यंत या मार्गावर अवजड वाहतूक पूर्णतः बंद ठेवावी तसेच अवजड वाहतुकीच्या गाडय़ांना सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंतच तालुक्यात परवानगी द्यावी, अशी भागणी करण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोणतेही अधिकारी या परिसरात न फिरकल्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक रेखा जाधव, पोलीस नाईक विनय मनवल, पोलीस हवालदार किशोर धातकर, पोलीस शिपाई कुलदीप दाभाडे करीत आहेत.
.. तर बसपा आंदोलन छेडणारः अनिकेत पवार
बुधवारी अपघातामध्ये कोळीसरे बौध्दवाडी येथील दर्शिल प्रमोद सावंत या दहा वर्षीय बालकाचा जागीच अंत झाल्याने वाटद-खंडाळा पंचक्रोशीतील बौद्ध बांधव व बौद्ध संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्या अनुषंगाने रत्नागिरी तालुक्यातील बहुजन समाज पार्टीही मैदानात उतरली असून जिंदाल कंपनी व रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत संघटनेने आग्रही भूमिका घेतली आहे. या बाबत लवकरच परिवहन अधिकाऱयांची भेट घेतली जाणार असल्याचे बसपाचे रत्नागिरी विधानसभा कार्यकर्ते अनिकेत पवार यांनी सांगितले.
मोठय़ा प्रमाणात होणाऱया ओव्हरलोड वाहतुकीमुळे यापूर्वीही दहा बळी गेले आहेत. यामुळे बसपाचे कार्यकर्ते आक्रमकपणे जिंदल कंपनी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱयांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत भूमिका मांडणार आहेत. कंपनीचे अधिकारी व आरटीओचे अधिकारी यांचे साटेलोटे आहे का, असा सवाल करत या बाबत गांभीर्याने निर्णय न घेतल्यास बसपाचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही पवार यांनी दिला आहे.