केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची सूचना : मंत्री, अधिकाऱयांशी केली चर्चा
प्रतिनिधी /बेंगळूर
निश्चित केलेल्या वेळेत ग्रामीण भागात घरोघरी शुद्ध पेयजल पुरविण्यासाठी जलजीवन मिशन योजनेतील कामे त्वरित पूर्ण करा, अशी सूचना केंद्रीय जलशक्ती खात्याचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी राज्यातील मंत्री आणि अधिकाऱयांना दिली.
यादगीर जिल्हय़ातील बसवसागर (नारायणपूर) जलाशयाला भेट देण्यासाठी गजेंद्रसिंग शेखावत मंगळवारी राज्य दौऱयावर आले होते. दिल्लीहून विमानाने बेंगळूरला आल्यानंतर त्यांनी जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्री येडियुराप्पा, राज्यातील प्रमुख मंत्री आणि पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जलजीवन मिशन योजनेंतर्गत 2024 पर्यंत देशातील 18.93 कोटी घरांना शुद्ध पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. या योजनेद्वारे राज्यातील रायचूर आणि यादगीर या जिल्हय़ांमधील ग्रामीण भागात प्रथम प्राधान्याने नळ कनेक्शन देण्याची सूचनाही शेखावत यांनी अधिकाऱयांना दिली.
2021-22 या वर्षात ग्रामीण भागातील 25.17 लाख घरांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. रायचूर आणि यादगीर जिल्हय़ांत बहुग्राम पाणीपुरवठा योजना जारी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या दोन्ही जिल्हय़ांमध्ये या योजनेंतर्गत 2 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. लवकरच या योजनेतील कामांसाठी निविदा मागविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना दिली.
बैठकीप्रसंगी गृहमंत्री बसवराज बोमाई, लघुपाटबंधारे मंत्री जे. सी. माधुस्वामी, राज्य आणि केंद्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘मेकेदाटू’संबंधी सर्व बाबींचा विचार करणार…
कावेरी नदीवरील मेकेदाटू येथील जलाशय निर्माण योजनेसंबंधी केंद्र सरकार सर्व बाबींचा विचार करून योग्य निर्णय घेईल, असे आश्वासन गजेंद्रसिंग शेखावत यांनी दिले. कर्नाटकाच्या प्रस्तावित मेकेदाटू जलाशय निर्मितीला तामिळनाडूने आक्षेप घेतल्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. या योजनेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे याविषयी अधिक प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले.