प्रतिनिधी / इचलकरंजी-कुरुंदवाड
जुलै महिन्यात जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या महापुराने पूरग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासह विविध मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निघालेल्या जलसमाधी पदयात्रा नृसिंहवाडी येथे येण्यास काही मिनिटाचा कालावधी बाकी होता. याचदरम्यान एका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्याने नृसिंहवाडी गावानजीकच्या पंचगंगा पुलावरून नदीत उडी टाकली. यामुळे जलसमाधी पदयात्रेत एकच गोधळ उडाला.
कार्यकर्त्याने नदीत उडी टाकल्याची बाब नदीमध्ये रेस्क्यु फोर्सची गस्ती घालीत असलेल्या पथकाला समजली. या पथकातील कर्मचारानी यात्रीकी बोटीसह घटना स्थळी धाव घेतली. बुडणाऱ्या कार्यकर्त्याच्या दिशेने धाव घेवून त्याला वाचविले.
दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी कुरुंदवाड येथील पंचगंगा नदीवरील मुख्यमंत्री दिनकर यादव पुलावर आले असता त्याच्या समोरच संघटनेच्या आणखीन एका कार्यकत्याने पंचगंगेत उडी टाकली. अर्धा तासामधील ही दुसरी घटना आहे.
पंढरपूर येथील बाहुबली राजाराम सावळे (43) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सावळे यांनी अलीकडील शेतातून येऊन पंचगंगा नदीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रेस्क्यू फॉर्स सतर्कतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यात यश आले. त्या शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र, याआधीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या जलसमाधी यात्रेची दखल घेत उद्या सोमवारी दुपारी तीन वाजता वर्षा बंगल्यावर बैठक बोलावल्याचे वृत्त आहे. दरम्यान तरीही कार्यकर्ते आक्रमकच झाल्याचे पाहयला मिळाले.