प्रतिनिधी /सातारा :
जालना जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणारे कराड तालुक्यातील तारूखचे रहिवाशी पोलीस निरीक्षक संग्राम शिवाजीराव ताटे (वय 37) हे गेल्या 13 दिवसापासून बेपत्ता होते. ते खंडाळा येथील जुना टोलनाका जवळ एका हॉटेलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या हातावर फोन नंबर लिहल्याने यावर संपर्क साधून यांची माहिती नातेवाईक व पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना तात्काळ खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता दोन्ही मोबाईल घरात ठेवून मित्राकडे जातो असे सांगून बेपत्ता झाले होते. दोन दिवस झाले तरी पोनि ताटे हे परत न आल्याने त्याच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार जालना पोलीस ठाण्यात दिली होती. जालनासह सातारा जिल्हा पोलिसही त्याचा शोध घेत होते. दहा-बारा दिवस झाले तरी त्यांचा काहीच शोध लागत नसल्याने पोलिसांनी तपासाची चक्र अधिक गतिमान केली. तोच दि. 13 रोजी रात्री उशीरा खंडाळा येथील जुना टोलनाका जवळ एका हॉटेलमध्ये पोनि ताटे हे बसले होते. यावेळी त्यांनी पुसट अक्षरात हातावर पत्नीचा मोबाईल नंबर लिहला होता. हा नंबर हॉटेलमध्ये येणाऱया ग्राहकांना दाखवत असताना ते बेशुद्ध झाले. ही बाब ग्राहक व मालकांच्या लक्षात आल्याने त्यांनी या नंबरवर फोन केला. त्यांच्या पत्नीला यांची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ नातेवाईक व तपास अधिकाऱयांना पोनि ताटे हे खंडाळा येथे असल्याचे सांगितले.पोलिसांनी हॉटेलमध्ये पोहचून पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.