ऑनलाईन टीम / पुणे :
ग्रामीण भागातील साचेबद्ध वातावरणात आणि ग्रामीण पारंपारिक संकल्पनांचा पगडा असलेल्या कुटुंब व्यवस्थेत मी वाढले. मात्र यातून निर्माण झालेल्या न्यूनगंडाने माझे व्यक्तिमत्व झाकोळून गेले. पण या सगळ्यातून बाहेर पडत पुण्याच्या साहित्यविश्वात मी पाय रोवून उभे राहिले, यामागे आव्हानांचे अनेक पदर आहेत.
जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर न्यूनगंडाच्या सीमारेषा नक्कीच ओलांडता येतात, असे मत संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार यांनी व्यक्त केले.
विवेक साहित्य मंचतर्फे आयोजित साहित्याचा विविधांगी वेध घेणा-या ‘साहित्य विश्व’ या उपक्रमांतर्गत स्वाती यादव यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. यावेळी चंचला काळे यांनी त्यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला.
सुनीताराजे पवार म्हणाल्या की, माझे बालपण हे अतिशय सुरक्षित वातावारणात गेले. वडिल आणि भाऊ यांच्या शिस्तित वाढत असल्याने आणि ग्रामीण भागात स्त्रीयांना उपलब्ध असलेल्या स्वातंत्र्यात माझे पालन पोषण झाले. त्यामुळे मी त्या वातावरणाच्या चौकटीतच बंदिस्त होऊन खूप बुजरी झाले. अनेकदा मोठ्यांच्या दडपणाखाली येत असल्याने माझा स्वभाव खुप अबोल झाला. तसेच त्याचा माझ्या आत्मविश्वासवर देखील नकारात्मक परिणाम झाला. कोणाशी बोलायची माझी हिमंत होत नसे. माझ्या मनात स्त्री आणि पुरुष यांचे जोखड घट्ट बसले होते. त्या जोखडातून बाहेर पडून मी आज पुण्यातील आप्पा बळवंत चाैकात प्रकाशन विश्वात वेगळा दृष्टीकोन आणि वेगळे ध्येय बाळगून वाटचाल करीत आहे. अबोल स्वभाव ते आज वेगवेगळ्या व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करण्यापर्यंतचा माझा प्रवास नक्कीच सोपा नव्हता परंतू संघर्ष आणि प्रचंड सयंम बाळगत मी इथवरचा प्रवास करु शकले, असे त्यांनी यावेळी सांगितले.