सोमवारी निर्णय होणार की लांबणीवर पडणार?
प्रतिनिधी /बेळगाव
सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी पाणीपुरवठा विभागाच्या हंगामी कामगारांनी आंदोलन छेडले होते. आंदोलन मागे घेण्याच्या विनंतीनंतर केवळ व्हॉल्वमन आणि कामगारांना रूजू होण्याची सूचना करण्यात आली होती. बिल कलेक्टर व अन्य कामगारांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे या कामगारांना कामावर घेणार की नाही? याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून पाणीपुरवठा मंडळाकडे काम करत असलेल्या हंगामी कामगारांना सेवेत कायम करावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र याबाबत प्रशासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे 359 हंगामी कामगारांनी सोमवार दि. 10 पासून कामबंद आंदोलन छेडले होते. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असल्याने आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती महापालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा कामगारांना केली होती. पण कामगारांनी याबाबत माघार घेतली नाही. पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. व्हॉल्वमनना संपर्क साधून पाणी सोडा, अशा विनवण्या केल्या. त्यामुळे पाणीपुरवठा कामगारांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेऊन जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन कामावर रूजू होण्यासाठी परवानगी मागितली. पण महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले होते.
त्यामुळे पाणीपुरवठा कामगारांनी महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांची भेट घेऊन विनंती केली होती. पण जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीनंतरच कामावर रूजू होण्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेतली असता व्हॉल्वमन व दुरुस्तीचे काम करणाऱया कामगारांना रूजू होण्यासाठी परवानगी दिली होती. सोमवार दि. 24 नंतर उर्वरित कामगार व बिल कलेक्टरांना रूजू होण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे बिल कलेक्टर व अन्य विभागातील कामगारांना पुन्हा घेणार की कमी करणार, अशी धास्ती लागून राहिली आहे. जिल्हाधिकारी कोरोनाबाधित असल्याने सोमवारी याबाबतचा निर्णय होणार की लांबणीवर जाणार? याबाबत कामगारांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांच्या आदेशाकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे.