प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा बँक शेतकऱ्यांची असल्याचे म्हटले जाते. परंतु ही बँक पुढाऱ्यांची, राजकारण्यांची आहे. याच बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये जास्त रस हा प्राधान्याने राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवला आहे. काँग्रेससह इतर पक्षांना दुय्यम स्थान या निवडणूकीत दिले गेले आहे. तरीही भाजपाचे आमदार व विद्यमान चेअरमन शिवेंद्रराजेंची प्रस्तापित असलेल्या राष्ट्रवादी पक्षासोबत दिलजमाई झाल्याची चर्चा सुरु आहे. भाजपा पॅनेल टाकणार होते. परंतु आता शिवेंद्रराजे हे विरोधकांसोबत असल्याने भाजपाची काय ध्येयधोरणे राहणार, खासदार रणजितसिंह, आमदार जयकुमार गोरे हे पॅनेल टाकणारच, त्यामुळे राष्ट्रवादीचा बिनविरोधचा मनसुबा धुळीला मिळणार आहे. सोमवारी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सहकार विभागातून वर्तवली जात आहे.
‘विना सहकार नाही उद्धार’ या तत्वानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेत बहुतांशी सर्वच पक्षांचे पुढारी संचालक म्हणून आहेत. त्यामध्ये आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीच्याच ताब्यात ही बँक राहिली गेली आहे. बँक ज्या पक्षाच्या ताब्यात त्या पक्षाकडून इतर निवडणूकीवेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रचाराची साखरपेरणी केली जाते. मग लोकसभा असेल किंवा आमदारकी असेल. जिल्ह्यात प्रत्येक भागात जिल्हा बँकेची शाखा असतेच. त्याच जिल्हा बँकेचा वरद हा विकास सेवा सोसायट्यावर असतो. त्यामुळे पक्षीय अजेंडा आपोआपच विना सहकार नाही उद्धार असाच ठसवला जातो. सर्वसामान्य प्रगतशील शेतकरी कधी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या पॅनेलवर आजपर्यंत सातारा जिल्हावासियांना दिसला नाही. आता जिल्हा बॅंकेची निवडणूक सोमवारी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.