प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्याने व्यवहार सुरू झाले आहेत. परप्रांतीय कामगार पुन्हा राज्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने सतर्क रहावे. रेडझोन वगळता अन्यत्र लॉकडाऊन आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास तेथे लॉकडाऊन कडक करावे, यासंदर्भातील निर्णय पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱयांनी घ्यावा, अशी सुचना गृहमंत्री अनील देशमुख यांनी केली. जिल्हय़ात ग्रामीण भागात कोरोनाचे अधिक रूग्ण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री अनील देशमुख यांनी रविवारी सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात कोरोनाची आढावा बैठक घेतली. बैठकीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. योगेश साळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्हय़ातील कोरोना स्थितीची माहिती दिली. यावर मंत्री देशमुख म्हणाले, जिल्हय़ात ३ मे पर्यत फक्त १४ पॉझिटिव्ह रूग्ण होते. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर संख्या वाढत गेली. परराज्य, जिल्हय़ांतून जिल्हय़ात व्यक्ती आल्या. त्यातून शहरापेक्षा ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रूग्ण वाढत गेले. ग्रामीण भागात ६२८, शहरी भागात ७३ तर नगर पालिका क्षेत्रात १३ पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. परजिल्हय़ांतून सुमारे दीड लाख लोक जिल्हय़ात आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ८१४ झाली. त्यापैकी ७१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यात आरोग्य यंत्रणेचे काम चांगले असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री देशमुख म्हणाले, जिल्हय़ातील ३८ हजार परप्रांतीय कामगारांना २६ ट्रेन आणि १५ बसेसद्वारे परत पाठवले आहे. राज्यातून १७ लाख कामगारांना ८५० सर्व्हीस रेल्वेद्वारे तर २० लाख कामगारांना ५ हजार बसेसद्वारे उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यात पाठवले आहे. सध्या २५ सर्व्हीस रेल्वे सुरू आहेत. राज्यात लॉकडाऊन शिथील होते आहे. उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय कामगार परत येत आहेत. जिल्हा प्रशासन त्याची तपासणी, नाव, मोबाईल नंबरची नोंद ठेवत आहे. भविष्यात परप्रांतीय कामगारांची संख्या वाढणार आहे, जिल्हा प्रशासनासमोर त्यांचे मोठे आव्हान आहे. याचे नियोजन प्रशासनाने करावे. गरज वाटल्यास शिथील झालेल्या लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. याचा निर्णय पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्यांनी घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.