जिल्ह्य़ातील २०८९ शाळांमधील विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण घेणार : कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक
प्रतिनिधी/कोल्हापूर
ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दहा दिवसापासून शाळा बंद केल्या आहेत. परंतू शाळा बंदला शिक्षण संस्था, शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या 112 शाळा आणि जिल्हा परिषदेच्या 1977 अशा एकूण 2089 शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. परंतू शासनाचे लेखी आदेश दिल्यानंतरच जिल्हा परिषद आणि महापालिका शिक्षण विभागाकडून शाळांना सूचना दिल्या जातील, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.
कोरोना काळात बंद असलेल्या शाळा तब्बल पावनेदोन वर्षानंतर 4 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या, या शाळा कशातरी तीन महिने सुरू राहिल्या. तेवढ्य़ात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 जानेवारीपासून शाळा बंद केल्या. शासनाच्या या निर्णयाला शिक्षक संघटनांसह इंग्लिश मिडियम स्कूल असोशिएशनने कडाडून विरोध केला. हा विरोध लक्षात घेवू सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्य़ात 15 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांचे 100 टक्के लसीकरण झालेले आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नसल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. शाळांची स्वच्छता, सॅनिटायझेशन यापुर्वीच झालेले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या नियमांचे पालन करीत अध्यापन, अध्ययन केले जाणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास खुंटला होता. खेळ, संवाद आणि वाचन बंद होवून स्क्रिन टाईम वाढला असल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा वाढला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात गुरफटलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण घेण्याचा, खेळण्या-बागडण्याचा आनंद मिळणार आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार महापालिकेचे व जिल्हा परिषदेचे पहिली ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.
जिल्हा परिषद व महापालिका शाळा व विद्यार्थी
जिल्हा परिषद पहिली ते बारावी शाळा विद्यार्थी
1977 453543
महापालिका शाळा आठवी ते बारावी विद्यार्थी
112 50718
शासनाचा स्वागतार्ह निर्णय
शाळा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. प्राथमिक शिक्षक संघाची शाळा सुरू कराव्या ही आग्रही मागणी होती. आŸनलाईन शिक्षणात मर्यादा येत होत्या. आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देण्याचा आनंद आम्हालाही होणार आहे.
लक्ष्मी पाटील (महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ)