प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात एकूण कोरोना बाधितांची संख्या 60 हजार 731 एवढी झालीय. त्यात दररोज 100 ते 150 च्या पटीत पुन्हा भर पडत असताना दोन दिवस कोरोनामुक्तीचा वेग 200 पटीत होता. रविवारी सायंकाळी कोरोनामुक्तीचा वेग मंदावला आणि 47 जणांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, एकूण कोरोनामुक्ती 57 हजारांच्या पार गेली असून एकूण 57 हजार 113 जणांनी कोरोनावर केलेली मात या लढाईला बळ देणारी आहे. मृत्यूदर घटला असून यातच लसीकरण मोहीम वेगाने सुरु असून लोक निर्भयपणे लस घेवू लागले आहेत आणि काळजी घेत आहेत.
कडक उन्हात देखील कोरोना
उन्हामुळे कोरोना संसर्गाला आळा बसतो अशी चर्चा गतवर्षी नागरिकांमध्ये होती. मात्र एक वर्षांनंतर मार्चमध्ये कोरोना बाधितांचा आकडा 100 ते 150 च्या पटीत येत आहे. त्याच पटीत येणारी कोरोनामुक्ती ही दिलासादायक असली तरी कडक उन्हात देखील कोरोना संसर्ग पाठ सोडत नसल्याची चर्चा नागरिक करत आहेत. त्यामुळे उन्हाळा कडक होवू लागला असला तरी लोक थंड पाणी, पेये, आईस्क्रीम खाणे देखील टाळत आहेत. थंड खाल्यानंतर सर्दी, खोकल्याचे व्हायरल इन्फेक्शन होत असल्याचे समोर येत असून त्यामुळे दवाखान्यात नागरिक उपचार घेत आहेत.
नियम पाळा, कोरोना टाळा
जिल्हय़ातील 144 केंद्रावर दररोज वेगाने लसीकरण सुरु आहे. लोकांच्या मनातील लसीकरणाविषयीची भीतच नव्हे तर कोरोनाची भीतीही पार निघून गेल्याचे चित्र सध्या जिल्हय़ात आहे. मात्र बाधित वाढ होत असल्याने नागरिक भरत उन्हात देखील मास्क वापरताना दिसत आहेत. मास्क न वापरणाऱयांवर पोलिसांकडून जागीच कारवाई होत असल्याने त्याचाही धसका सर्वांना आहेच. मात्र, लसीकरण सुरु असले तरी अद्याप काही दिवस कोरोना संसर्गात प्रशासनाचे नियम पाळा अन कोरोना टाळा हे करावेच लागणार आहे.
रविवारी कोरोना देखील सुट्टीवर
रविवारी कोरोनामुक्तीचा वेग मंदावला. फक्त 47 जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर एक देखील नमुना तपासणीला पाठवण्यात आला नाही. अहवालात किती नमुने तपासणीस पाठवण्यात आले याचा उल्लेख नाही. त्यामुळे रविवारी कोरोना देखील सुट्टीवर जातो की काय असे नागरिक गंमतीने म्हणत आहेत. मात्र, लसीकरण, तपासणी आणि उपचार अशा तिन्ही पातळीवर आरोग्य विभागवरील ताण वाढला आहे. त्यातच वाढत असलेला कडक उन्हाळा अन बाधित वाढीचे आकडेही घाम फोडत आहेत.