प्रतिनिधी/ सातारा
फेब्रुवारीत सुरु झालेल्या अल्प बाधित वाढीने मार्च महिन्याच्या मध्यंतरी उग्र स्वरुप धारण केले आहे. एकीकडे कडक उन्हाळय़ाने सर्वजण हैराण झालेले असताना दुसरीकडून सुरु असलेला कोरोनाचा तडाखाही सर्वांचे घाम काढत आहे. शनिवारच्या अहवालात गेल्या पाच महिन्यांपूर्वीं झालेली उच्चांकी बाधित वाढ झाली असून 327 जणांचा अहवाल बाधित आला आहे. यामध्ये सातारा 75, फलटण 50, कोरेगाव 26, कराड 24 ही आकडेवारी चिंताजनक आहे. 8 तालुक्यात दोन अंकी वाढ तर तीन तालुक्यात अगदी नगण्य एक अंकी वाढ झालीय.
दरम्यान, रविवारी सायंकाळी अहवालात फक्त 19 जण नागरिक बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 3 बाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
सातारा, फलटणमध्ये चिंताजनक स्थिती
कराडनंतर हॉटस्पॉट ठरलेला सातारा शहर व तालुका पुन्हा हॉटस्पॉट ठरला असून त्या पाठोपाठ फलटणसह कराड, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, खटावमधील चिंताजनक आहे. फलटणमधील तरडगावात अल्पवाढ सुरुच आहे. तर माण, जावली, पाटण तालुके सावरताना दिसत आहेत. हॉटस्पॉट ठरलेली दहिवडी शहर देखील सावरले आहे. मात्र, सातारा तालुका व शहरातील स्थितीबाबत सातारा पालिका व तालुका प्रशासनाने आता कठोर उपाय योजना करण्याची वेळ आलीय. लोक नियम पाळताना दिसत आहेत. पण बाधित वाढ तर होतच असल्याने नेमके काय ? असा सवाल नागरिकांना पडलाय.
जनता कर्फ्यूची आज वर्षपूर्ती
गतवर्षी 22 रोजी पंतप्रधान मोदी यांनी जनतेला जनता कर्फ्यूची हाक दिली होती. सातारा जिल्हय़ात जनता कर्फ्यूला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला होता. कोरोनाची एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनात भरलेली होती. या दिवशी जिल्हय़ाने एक अभूतपूर्व शांतता अनुभवली. सर्व रस्ते, गल्लीबोळ, शहरे, गावे ओस पडली होती. 30 लाख अबालवृध्द घरात बसून येणाऱया संकटाची चाहूल घेत होते. न भूतो न भविष्यातील अशी भीतीदायक शांतता जिल्हय़ाने अनुभवली त्याला आज 22 रोजी वर्ष पूर्ण होत आहे. येथूनच सुरु झाली होती कोरोनाविरुध्दची लढाई.
शनिवारी अहवालात 327 बाधित
शनिवारी गेल्या पाच महिन्यापूर्वी झालेली उच्चांकी बाधित वाढ पुन्हा झाली असून तब्बल 327 जणांचा अहवाल बाधित आला आहे. यामध्ये एकटय़ा सातारा तालुक्यात 75 बाधित असून फलटण 50, कोरेगाव 26, कराड 24, खंडाळा 24, खटाव 19, वाई 18, महाबळेश्वर 18 तर तीन तालुक्यात नगण्य बाधित वाढ असून यामध्ये जावली 5, माण 5, तर पाटण तालुक्यात फक्त 1 बाधित समोर आला आहे. मात्र, आठ तालुक्यांत चिंता वाढली आहे.
काळजी घेवूनच कोरोनाला हरवावे लागेल
सध्या लसीकरणाच कार्यक्रम आरोग्य विभागाकडून युध्दपातळीवर सुरु आहे. लसीकरण आणि वाढत्या बाधितांमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभाग कार्यमग्न आहे. मात्र, मार्चमध्ये पुन्हा 300 च्या पटीत वाढू लागलेली बाधितांची संख्या धोक्याची सूचना देत आहे. उगाच काहीही होणार नाही किंवा होत नाही म्हणून जो निष्काळजीपणा समाजात आला आहे तो टाळावा लागणार आहे. लसीकरण करुन घेतानाच मास्क, स्वच्छता व सुरक्षित अंतर ही त्रिसुत्री पाळूनच कोरोनाला हरवावे लागणार आहे.