भाजी विक्रेते रस्त्यालगत – पार्किंग उडतोय बोजबारा
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडीची समस्या गंभीर बनली असून प्रशासन मात्र मोती चौक ते 501 पार्टी या मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात नेहमी पुढाकार घेत असते. यामुळे महात्मा जोतीबा फुले भाजी मंडई परिसरात कोंडीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जुन्या गाडय़ाचे पार्किंग, किरकोळ विक्रेते तसेच भाजी विक्रेते रस्त्यालगत बसले आहेत. रस्ता अरूंद असल्याने दररोज जीवघेणी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असताना प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने कोंडीची समस्या चव्हाटय़ावर येवून पडली आहे.
जुनी भाजी मंडई अशी ओळख असणाऱया महात्मा जोतीबा फुले भाजी मंडईत भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. यामुळे भाजी मंडईच्या बाहेर भाजी विक्री जोमात सुरू आहे. यातच किरकोळ विक्रेत्यांची भर पडली आहे. ग्राहक मोठय़ा संख्येने येथे येत असल्याने विक्रेत्यांना यांचा चांगलाच फायदा होत आहे. याच ठिकाणी असणाऱया पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. तसेच प्रवासी वाहने, मोठे ट्रक, चारचाकी वाहने, जुन्या गाडय़ा याच परिसरात उभ्या करण्यात येतात. यामुळे अरूंद रस्ता आणखी अरूंद झाला आहे. यामार्गे होणारी वाहतूक अनेक वेळा मोडून पडत आहे. याच परिसरात साईअमृत हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलची ऍम्ब्युलन्स दिवसभरात चार ते पाच वेळा कोंडीत सापडते. यामुळे रूग्णांच्या जीव धोक्यात येत असतो. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती नाही. यामुळे दुचाकीस्वार बेभान होवून वाहने चालवतात. किरकोळ अपघात होण्याचे प्रमाणही या ठिकाणी जास्त आहे. दररोज जीवघेणा प्रवास या ठिकाणी सुरू असताना संबंधित प्रशासन बघ्यांची भूमिका घेत असल्याची चर्चा सुरू आहे.