जिल्हा रुग्णालयात इंजेक्शनसाठी रांगा – खासगी रुग्णालयांना कमतरता
प्रतिनिधी/ सातारा
मार्चपासून सुरु झालेल्या बाधित वाढीने एप्रिल महिन्यात पुन्हा जिह्याची चिंता वाढवली असताना आजमितीस जिल्हय़ात शासकीय व खासगी कोव्हीड रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या एक हजारावर गेली आहे. त्यामुळे व्हेंटेलेटर बेड नसण्याची समस्या समोर असतानाच जिल्हय़ातील खासगी रुग्णालयांना कोरोना बाधितावर उपचारार्थ महत्वपूर्ण असलेले रेमडिसवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने या इंजेक्शनची मोठी कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात या इंजेक्शनची आवश्यकता असणाऱयांची रांग लागू लागल्याचे चित्र सध्या चिंता वाढवत आहे.
एप्रिल महिन्यात कोरानाचा जिल्हय़ात विस्फोट झाला आहे. दररोज येणारे बाधित वाढीचे आकडे भीतीदायक असून त्यामुळे शासकीयसह खासगी रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांचे प्रमाण वाढले. जिल्हय़ात खासगी रुग्णालयात देखील बाधित रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून खासगी रुग्णालयात ज्या गंभीर रुग्णांना रेमडिसवीर इंजेक्शनची गरज आहे, त्यांना तुटवडय़ामुळे इंजेक्शन मिळण्यात अडचणी होवू लागल्यात. परिणामी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांच्या केबीनपुढ रेमडिसवीर इंजेक्शनसाठी रांगा लागू लागल्या आहेत. जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रेमडिसवीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी येवू लागल्यात. पण ते बाजारात मिळत नाही.
शासकीय कोव्हीड रुग्णालयात देखील रुग्ण दाखल असल्याने तेथील रुग्णांसाठी सध्या आरोग्य विभागाकडे साठा असलेली रेमडिसवीर इंजेक्शनचा वापर करावा लागत असल्याने आरोग्य विभागाकडील इंजेक्शन खासगी रुग्णालयांना देवू शकत नाहीत. सध्या जिल्हा रुग्णालयाकडे 2 हजार इंजेक्शनचा साठा असून त्याचा वापर शासकीय कोव्हिड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी आवश्यकते नुसार करण्यात येत आहे. तर आणखी 5 हजार इंजेक्शनची मागणी करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तुटवडा
खासगी रुग्णालयात देखील कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून ज्यांना आवश्यकता आहे. अशा खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱया रुग्णांना रेमडिसवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने अडचण येत आहे. जिल्हा रुग्णालयातून देखील ते उपलब्ध होवू शकत नाही. याबाबत प्रशासनाने काही तरी मार्ग काढण्याची गरज असल्याचे डॉ. कमलाकर दिवेकर यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
वापर वाढल्याने तुटवडा जाणवतोय
पहिल्या लाटेच्या वेळी रेमडिसवीर 15 ते 20 टक्के रूग्णांना दिले जात होते. आज हे प्रमाण खासगी रुग्णालयातून 80 टक्केपर्यंत पोहोचले आहे. हे स्टॅंडर्ड प्रोटोकॅलमध्ये बसत नाही. हे औषध व्होअर द काऊंटर विक्रीला उपलब्ध होत नाहीत. जिथे फार्मसी आहे तिथे मात्र रूग्णाला ते दिले गेले आहे. ही औषधे फक्त प्रिक्रिप्शन वरच मिळतात. म्हणून ती बाहेर उपलब्ध करुन दिलेली नाहीत. एका महिनाभरापुर्वी एफडीएने या औषधाच्या किंमती कमी करण्याची मोहीम सुरू केली. एका कंपनीकडून किंमत कमीही करण्यात आली. ती किंमत साडे आठशे रुपये झाली असली तरी आताही एमआरपी नुसार रेमडीसवीरची विक्री साडे चार ते पाच हजारांना होते आहे.
चौकट
12 एप्रिलपासून पुरवठा सुरळीत होईल
एका रूग्णालय पाच चे सात डोस दिले की रूग्णांच्या बिलातही वाढ होत आहे. सध्या तरी प्रत्येक रूग्णाला हे इंजेक्शन देण्याची खरच गरज आहे काय हे तपासून पाहणारा आरोग्य विभागाची यंत्रणा नाही. डॅक्टर स्वःतच ठरवून देत आहेत. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. 1 मार्चनंतर कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढले. 20 मार्चला कंपन्यांनी नव्या बॅच सुरु केल्या. 10 तारखेला नव्या व्हायल्स तयार होतील. 12 एप्रिल पासून पुरवठा सुरळीत व्हायला सुरूवात होईल, अशी माहिती समोर येत आहे.