आरक्षण सोडतीकडे लागले सर्वांचे लक्ष
प्रतिनिधी/ रत्नागिरी, चिपळूण, मंडणगड
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता संपूर्ण जिह्याचे लक्ष ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीकडे लागले आह़े सोमवार 25 जानेवारी रोजी जिह्यातील तब्बल 846 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत होणार आह़े त्यामुळे अनेक सरपंचपदासाठी इच्छुक या सोडतीकडे लक्ष ठेवून आहेत़ नशिबावर सोडून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून अनेक ठिकाणी इच्छुकांना शांत करण्यासाठी मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
सोमवारी होणाऱया सोडतीत अनुसूचित जातीसाठी 36, अनुसूचित जमातीसाठी 12, नागरिकांचा मागार प्रवर्ग (ओबीसी) 228 तर खुल्या प्रवर्गासाठी 570 पदे आरक्षित करण्यात येणार आहेत. यातील 407 ग्रामपंचायतीची सरपंचपदे ही विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित होणार आहेत़ प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता ही आरक्षण सोडत काढली जाणार आह़े रत्नागिरीत सावरकर नाटय़गृहात आरक्षण सोडत निघणार आहे.
जिह्यात नुकत्याच 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर आता जिह्यातील सर्व तालुक्यांतील ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत सोमवारी होणार आह़े दापोली तालुक्यातील 106 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आह़े यात अनुसूचित जातीसाठी 2 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षित होणार असून यातील एक महिलांसाठी आरक्षित असेल़ तर अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी 6 ग्रामपंचायतींची सरपंचपदे आरक्षित होणार आहेत़ त्यापैकी 3 महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत़
मंडणगडात 49 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत
तहसील कार्यालयाच्यावतीने मंडणगड तालुक्यातील सर्व 49 ग्रामपंचायतींच्या सरंपचपद आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 25 रोजी सकाळी 11 वा. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात होणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी येणाऱयांनी कोविड-19 बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, अशा लेखी सूचना तहसीलदार नारायण वेगुर्लेकर यांनी दिल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 2021 ते 2025 या कालावधीसाठी तालुक्यातील सर्व 49 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची आरक्षण सोडत आहे.
चिपळुणात ठरणार 130 गावांचे सरपंच
चिपळूण तालुक्यातील 130 ग्रामपंचायतींचे सरपंच 25 जानेवारी रोजी ठरणार आहेत. यासाठी शहरातील गुरूदक्षिणा सभागृहात सकाळी 11 वाजता होणाऱया आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी 83 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील 22 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित 61 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडून त्याचे निकालही जाहीर झाले. त्यानुसार गावाचे कारभारी ग्रामस्थांनी निवडले आहेत. मात्र त्यांचा प्रमुख म्हणजेच सरपंच सोमवारी आरक्षण सोडत ठरवणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सकाळी 11 वाजता या प्रक्रियाला सुरूवात होणार आहे. दोन तासांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असून यासाठी उपस्थित राहण्याचे पत्र तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी सर्व ग्रामपंचायतींना दिले आहे. त्यानुसार अनेकजण यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
नुकत्याच निवडणुका झालेल्या खेर्डी, कात्रोळी, अडरे, अनारी, पुंभार्ली, कोंडफणसवणे, कोंढे, खेरशेत, आगवे, मार्गताम्हणे-खुर्द, कळमुंडी, वालोटी, निरबाडे, मुंढे तर्फे सावर्डे, तोंडली, कुडप, कोंडमळा, आकले, भोम, रेहळेवैजी, पोसरे, धामणवणे, सावर्डे, ओवळी, नांदिवसे, रामपूर, मालघर, पाचाड, दळवटणे, मोरवणे, पिंपळी-खुर्द, चिंचघरी, कळंबट, शिरळ, पिलवली तर्फे सावर्डे, पेढांबे, कुशिवडे, मिरजोळी, येगाव, निवळी, मुंढे तर्फे चिपळूण, तळसर, नायशी, कोळकेवाडी, ताम्हणमळा, अलोरे, वेहळे रिक्टोली, तिवरे, कान्हे, नागावे, कळंबस्ते, कादवड, खरवते, तुरंबव, तनाळी आंबेरे-बुद्रूक, उभळे आगरगाव, दहिवली-बुद्रूक, कुटरे, लोणारी चिवेली बंदर, कापसाळ आदी ग्रामपंचायतींसह बिनविरोध झालेल्या व नजीकच्या काळात निवडणुका होणाऱया अशा मिळून 130 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सोडत होणार आहे. या पदासाठी गावागावात अनेकजण इच्छुक असून मागील काही वर्षांच्या आरक्षणाचा विचार करून यावेळी असे आरक्षण पडेल, मग मी सरपंच होईन, असे अंदाज बांधून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. तसेच काही ठिकाणी त्या-त्या प्रवर्गातील विशेष करून खुल्या प्रवर्गातील अनेकजण निवडून आल्याने त्यांनी हे पद आपल्या पदरात पडावे म्हणून पॅनल प्रमुखांकडे सेटींग लावण्यास सुरूवात केली आहे. यामुळे अन्य इच्छुकांना शांत करण्यासाठी पैशाचा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
46 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये होणार सेटींग
दरवेळी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपूर्वी सरपंच आरक्षण सोडत व्हायची. मात्र या पदासाठी होणारी रस्सीखेच व अन्य कारणांमुळे निवडणूक आयोगाने यावेळी निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण सोडत पध्दत आणली आहे. याचे सर्वांनी स्वागतही केले आहे. असे असताना सोमवारी तालुक्यात होणाऱया या पदाच्या सोडतीत निवडणुका झालेल्या 84 ग्रामपंचायतींसह नजीकच्या काळात निवडणुका होणाऱया 46 ग्रामपंचायतींसाठीही सोडत होणार आहे. त्यामुळे त्याची सोडत निवडणुकीपूर्वी का, असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्या निवडणुकीवेळी या पदाच्या दाव्यासाठी सेटींग होणार आहे.
राजापुरात 71 ग्रा.पं.चे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी
राजापूर तालुक्यातील 101 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण 25 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. तालुक्यातील 101 पैकी 71 ग्रामपंचायतींचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी तर निम्म्या ग्रामपंचायतींचे महिलांसाठी आरक्षित असणार आहे.
तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून आता सर्वांना सरपंचपदाचे वेध लागले आहेत. निवडणुका झालेल्या 51 ग्रामपंचायतींसह उर्वरित सर्व म्हणजे 101 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी 25 रोजी राजापूर नगर परिषदेच्या नाटय़गृहामध्ये सकाळी 11 वा. आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीत 101 पैकी 50 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असणार आहे.
या आरक्षणामध्ये अनुसुचित जातीकरीता 3 सरपंच पद आरक्षित असून यामध्ये दोन पदे महिलांसाठी आरक्षित होणार आहे. 27 ग्रामपंचायती नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित होणार असून त्यापैकी 13 पदे महिलासांठी आरक्षित आहेत. तर उर्वरित 71 ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार असून यामधून 35 सरपंचपद महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. यात ससाळे, शिळ, धोपेश्वर, गोवळ, उन्हाळे, गोठणेदोनिवडे, चिखलगाव, कोदवली, ओणी, कोंडीवळे, मंदरूळ, चुनाकोळवण, पन्हळेतर्फे सौंदळ, तळगाव, मोसम, पांगरे बु., दोनिवडे, कारवली, हरळ, रायपाटण, करक, पांगरीखुर्द, येरडव, कार्जिंडा, कोळंब, मिळंद, जवळेथर, हातदे, मोरोशी, सौंदळ, ताम्हाणे, तुळसवडे, फुपेरे, परटवली, ओशिवळे, आडवली, आंबोळगड, सोलगांव, शिवणेखुर्द, वाडापेठ, कशेळी, कोंडसर बु., कुंभवडे, पडवे, महाळुंगे, तारळ, वाल्ये, अणसुरे, कुवेशी, दळे, निवेली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.