स्मार्ट सिटीने घेतलेल्या जीवांचे नुकसान कोण भरून काढणार?
प्रतिनिधी / बेळगाव
एकाच वेळी खोदलेले रस्ते, एकाच वेळी पूर्णपणे बदलली गेलेली वाहतूक, डोळय़ात उडणारे धुळीचे लोट, महिनोंमहिने काही ठिकाणी झालेली एकेरी वाहतूक अन् यामुळे रस्त्यांवरून चालणेही कठीण बनतेय…. स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या बेळगाव शहरातील ही स्थिती सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक आणि जीवघेणी ठरत आहे. मागील दोन वर्षांत या स्मार्ट सिटीने तिघा जणांचा बळी घेतला. जे गेले ते पुन्हा परत येणार नाहीत, स्मार्ट सिटीने घेतलेल्या बळींची नुकसानभरपाई काही केल्या भरून निघणार नाही. अचानक जीव गमावलेल्यांचे आई-वडील आणि नातेवाईकांचे हुंदके आणि त्या दु:खाची किंमत अधिकाऱयांना समजू शकेल का? अनेक प्रश्न निर्माण होताहेत. याचवेळी स्मार्ट सिटी आणखी किती बळी घेणार? हा प्रश्न गांभीर्याने उभा राहिला आहे.
भाग्यनगर येथे सिटी बसखाली एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला ही घटना ताजी आहे. मागच्याच आठवडय़ात म्हणजेच चार दिवसांपूर्वी शनिवारी दुपारी भाग्यनगर, दुसऱया क्रॉसवर हा अपघात घडला. प्रसिद्ध चार्टर्ड अकौंटंट मनोज हुईलगोळ यांचा एकुलता मुलगा तनय (वय 19) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाची सिटी बस सीबीटीहून अनगोळला जात होती. सध्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अनगोळ मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भाग्यनगरमार्गे सुरू आहे. दुचाकीवरून जाणाऱया तनयला सिटी बसची धडक बसून हा अपघात घडला. रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झाले नाही, याला अनेक कारणे देता येतील. मात्र, तनयच्या जाण्याने हुईलगोळ कुटुंबीयांवर झालेल्या आघाताची किंमत ही कारणे चुकवू शकणार नाहीत. हे वास्तव आहे.
स्मार्ट सिटीशी संबंधित साऱयांनीच आत्मचिंतन करावे
अपघातात एकुलत्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या बेभरवशाच्या स्थितीमुळे आजकाल आपल्या मुलांना सायकल, दुचाकी, चार चाकी किंवा साधे चालतही रस्त्यावर सोडणे म्हणजे पालकांच्या मनात धस्स् होऊ लागले आहे. काही मिनिटांपूर्वी आपल्या अभ्यासात गुंतलेला आणि आईशी फोनवर बोलून घरी निघालेला तनय घरी पोहोचू शकला नाही. अपघात घडल्यानंतर बसच्या चालकाचे समुपदेशन करावे लागले. तनयच्या आई आणि वडिलांची भेट घेऊन एकुलता मुलगा गमावल्याने त्यांचे सांत्वन करण्याचे धाडस अनेकांना होईनासे झाले आहे. या साऱया परिस्थितीत सध्या स्मार्ट सिटीशी संबंधित साऱयांनीच आत्मचिंतन करण्याची वेळ निर्माण झाली आहे.
सध्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात सर्वत्र रस्ते-गटारींची कामे सुरू आहेत. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली कामे अद्याप संपता संपेनात, असे चित्र निर्माण झाले आहे. अनेक मुख्य रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे. यातून अचानक पर्यायी मार्गांवरील कोंडी वाढत आहे. विकास होऊ देण्यासाठी काही काळ त्रास सहन करावा लागेलच असे अधिकारी आणि त्यांच्याशी संबंधित राजकारणी सांगत असले तरी सध्या अशा परिस्थितीत रस्त्यांवर सामान्य माणसे, त्यांचे आई-वडील आणि मुलेबाळेच दगावताहेत, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
सध्या मुख्य रस्त्यांवरील कामांमुळे उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी, अपघात आदी प्रकार वाढले आहेत. कामातील दिरंगाईमुळे आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तनयचे उदाहरण ताजे आहे. यापूर्वी मंडोळी रोडवर एकाचा स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ात पडून जीव गेला होता. त्यापूर्वी केपीटीसीएल मार्गावर खोदलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱया एका महिलेची दुचाकी घसरून ती दगावली होती. एक घटना घडली की चर्चा होते आणि ती विसरलीही जाते. मात्र, ज्या घरातील व्यक्ती दगावते त्या घरातील इतरांची अवस्था काय होत असेल? याचा विचार करावा लागेल. अन्यथा, विकासाच्या नावाखाली बळी घेऊन अनेक घरे उद्ध्वस्त करण्याचे पातक स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित सर्वांवरच येणार आहे.
संबंधितांना धडा शिकवावा
प्रत्येक दगावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाने याचिका दाखल करावी आणि संबंधितांना धडा शिकवावा, असे सांगण्याचा प्रयत्न काही जाणकारांतून झाला. मात्र, भविष्याचा आधारच निघून गेला, घरात नेहमी हसणारा-बोलणारा माणूसच शिल्लक राहिला नाही. अशा वेळी तो हिरावून घेणाऱया मुर्दाडांवर गुन्हे दाखल करून काय करायचे? असाच प्रश्न मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. आपला मुलगा, बहीण, नातेवाईक गेला हे सत्य स्वीकारताना प्रचंड वेदना झालेल्या या कुटुंबीयांनी फोडलेल्या टाहेंचा, त्यांच्या वेदनेतील प्रत्येक क्षणाचा आणि भविष्यात सतत बोचत राहणाऱया त्यांच्यातील दु:खाचा विचार स्मार्ट सिटीला, संबंधित अधिकाऱयांना, कंत्राटदारांना आणि सर्वसामान्य माणसांना करावाच लागणार आहे.