जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध : राज्यातील आदर्श उपक्रम
तरुण भारत संवाद वार्ताहर / पंढरपूर
धाराशीव कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या ग्राम पंचायतीस १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने चेअरमन अभिजित पाटील यांनी जैनवाडी ग्राम पंचायतीला १ लाख रुपयांचा धनादेश दिला.
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. यामध्ये १२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. गावातील मतभेद, भावकितील भांडणे, पैशाचा अपव्यय होऊ नये म्हणून धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राज्यात सर्वप्रथम ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. ज्या ग्रामपंचायती बिन विरोध होतील त्या गावांना विकासासाठी व्यक्तिगत १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध सदस्य दीपक पवार, मधुरा पवार, हणमंत सोनवले, संगीता गोफणे,कल्पना माने, रुक्मिणी गोफणे, शोभा गोफणे, कल्पना शिंगटे, अशोक सदलगे यांचे सत्कार करून अभिजित पाटील यांनी अभिनंदन केले.
ग्रामपंचायत बिनविरोध एकोप्यासाठी एकत्रित करणारे दामोदर पवार, किरण दानोळे, अशोक मिरजे, अप्पासाहेब दानोळे, हिम्मत हासुरे, महादेव लिंगडे, विजय साळवे, मोहन माने, हणमंत सोनवणे, विलास गोफणे, मच्छिंद्र गोफणे, जालिंदर गोफणे आदी मान्यवर तसेच गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.