नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ट्विटर या समाजमाध्यमाच्या मनमानीला रोखण्यासाठी आता भारत सरकारने भारतनिर्मित पर्याय शोधला आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या ‘कू’ या व्यवस्थेचा उपयोग सरकार आपल्या संदेशवहनासाठी करणार आहे.
यापुढे महत्वाची ताजी महिती, सूचना, घोषणा आणि इतर सरकारी माहिती लोकांना ‘कू’ च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. प्रथम ही सर्व माहिती कूवरून प्रसारित करण्यात येईल. त्यानंतर दोन ते तीन तासांनंतर ती ट्विटरवर प्रसारीत करण्यात येईल, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.
निर्णय घेण्याचे कारण
खलीस्तानच्या बेकायदेशीर मागणीला पाठिंबा देणारी 1 हजार 700 हून अधिक ट्विटर हँडल्स बंद करण्याची सूचना केंद्र सरकारने ट्विटरला दिली होती. ट्विटरने हजारांहून अधिक हँडल्स बंद केली. मात्र सरकारच्या सूचनेचे पूर्णतः पालन करण्यास टाळाटाळ चालविली. यामुळे केंद्र सरकारने ट्विटरला पर्याय म्हणून विकसीत करण्यात आलेल्या कूला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.
कायद्याचे पालन करू
कू हे माध्यम अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन आणि पुरस्कार करते. तथापि, आम्ही प्रत्येक देशातील कायद्याचा आदर करतो. या कायद्यांचे पालन करतच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर करू, असे प्रतिपादन कू च्या सहसंस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अप्रमेया राधाकृष्ण यांनी मंगळवारी केले.
कू च्या लोकप्रियतेत वाढ
अलिकडच्या काळात कू च्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. गेल्या दोन तीन आठवडय़ांमध्ये किमान 60 लाख भारतीयांनी हे ऍप डाऊनलोड पेले आहे. कू चे तंत्रज्ञान नेहमी सुधारले जाईल आणि ही व्यवस्था अधिकाधिक प्रभावी केली जाईल, असे संस्थापक कंपनीचे म्हणणे आहे. अल्पावधीतच हे माध्यम ट्विटरला मागे टाकण्याची शक्यताही बोलून दाखविली जात आहे. कू या माध्यमात चीनची कोणतीही गुंतवणूक असणार नाही. चीनची शुनवेई कंपनी गुंतवणूक मागे घेऊन भारतातून काढता पाय घेत आहे, अशीही माहिती देण्यात आली.