मी खूपच लहान असतानाची गोष्ट आहे. एकदा केव्हातरी घरातल्यांनी मला तुळशीबागेतून ‘डॉक्टरचा सेट’ आणला होता. सेट म्हणजे काय तर एक प्लास्टिकची डबी होती. त्यात खोटा खोटा स्टेथोस्कोप, इंजेक्शनची सुई आणि औषधाची रिकामी बाटली वगैरे साहित्य होते. ते घेऊन मी बरेच दिवस घरातल्यांना आणि शेजारपाजारच्यांना ‘तपासून’ औषध, इंजेक्शन देत असे. फी म्हणून कधी लाडू, चॉकलेट मिळत. किंवा एखाद्या वेळी मोठी माणसं नुसतीच कडेवर घेऊन लाडाने पपी घेत. ते प्रकरण मला आवडत नसे. मी रागाने गाल पुसायचो. ते असो.
मोठेपणी मी ते स्वप्न विसरलो नव्हतो. पण एसेस्सी बोर्ड नावाच्या सैतानाने मला परीक्षेत पुरेसे गुण दिले नाहीत. मग मी मेडिकलला न जाता आर्टसला गेलो. पदवी घेतली, नोकरी केली, रिटायर झालो आणि अचानक परवा ते स्वप्न मला पुन्हा आठवले. अहा! डॉक्टर व्हायला हवे होते, हवे आहे. पण आता मला कोण डॉक्टर करणार.
माझी खंत मी नागजंपी ऊर्फ नाग्याला बोलून दाखवली. थोडा विचार करून त्याने मला धीर दिला, “त्यात काय असतंय रे, तू डॉक्टर पण होऊ शकतंय. फक्त थोडं धीर धर.’’
“काहीही काय बोलतोस, नाग्या. या वयात मला कोण मेडिकलला प्रवेश देणार आणि मी कसला अभ्यास करणार आणि डॉक्टर होणार. छे.’’
“तू आजकाल नुसतं व्हॉट्स अपवर पडीक असतंय. म्हणून तुला नवीन गोष्टी समजत नाय. अरे आता काळ बदललंय. तू थोडं धीर धर.’’
“म्हणजे काय होईल.’’
“सांगतंय, तुला सगळं सांगतंय. नुकतंच पेपरमध्ये आलंय की एका राज्यात पहिली ते अकरावी सगळय़ा इयत्तांमधलं सगळं विद्यार्थी परीक्षेशिवाय पास झालं असं सरकारनं जाहीर केलंय. ऑल इंडिया आता इंजिनिअरला प्रवेश घ्यायचं तर बारावीला विज्ञान रसायन विषय नसलं तरी चालतंय. हे असं आपल्या देशाचं प्रगती आणि विकास चालत राहिलं तर काही दिवसांनी नवीन नियम नक्की निघतंय की मेडिकलला प्रवेश घ्यायचं तर बारावी, दहावी, पहिली पास नसलं तरी चालतंय.’’
“खरं सांगतोस की काय? मग तर एखाद्या वेळी असा देखील नियम निघेल की विद्यापीठाच्या विभाग प्रमुखांना मिस्ड कॉल द्या आणि पदवी मिळवा.’’ माझी आयडिया नाग्याला फारच आवडली. सात मजली हास्य करीत त्याने मला टाळी दिली.