भारतीय तटरक्षक दलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 46 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून भारताच्या सागरी किनाऱयाचे संरक्षण करण्यासाठी अतुलनीय कामगिरी बजावतात. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, भारतीय तटरक्षक परिवाराला त्यांच्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे कोस्ट गार्ड हे व्यावसायिकांचे उत्कृष्ट संघ आहे, ते आमच्या किनाऱयाचे स्थिरपणे संरक्षण करतात आणि मानवतावादी प्रयत्नांमध्येही आघाडीवर असतात, अशा शब्दांमध्ये त्यांनी कौतुक केले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तटरक्षक दलाच्या जवानांचे त्यांच्या अतुलनीय वचनबद्धतेबद्दल कौतुक केले. मी आमच्या धाडसी भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या शुभेच्छा देतो. भारतीय किनारे सुरक्षित राखण्यासाठी, समुद्रातील मानवी जीवन वाचवण्यासाठी आणि आमच्या सागरी जैवविविधतेचे जतन करण्याच्या त्यांच्या अतुलनीय बांधिलकीला आम्ही सलाम करतो, असे शहा यांनी म्हटले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे, भारतीय तटरक्षक दल 1 फेब्रुवारी 2022 रोजी 45 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. भारतीय तटरक्षक दलाने भारताच्या सागरी क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेले एक शक्तिशाली सागरी दल म्हणून स्वतःला ठामपणे ओळख प्राप्त करुन दिली आहे. आज हे दल जगातील सर्वात मान्यताप्राप्त समकालीन तटरक्षक दलांपैकी एक आहे.
इंडियन कोस्ट गार्ड ही भारताची सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध आणि बचाव संस्था आहे. 18 ऑगस्ट 1978 रोजी तटरक्षक कायदा, 1978 द्वारे भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली. परंतु एक वर्षाच्या आधी 1 फेब्रुवारी 1977 रोजी आणीबाणीमुळे, तस्करी रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो.