प्रतिनिधी/चिपळूण :
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिह्यातील कोरोना रुग्णांची तपासणी जलदगतीने होण्यासाठी डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात टेस्टिंग लॅब उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, या रूग्णालयाने यापूर्वीच अशा लॅबची मागणी केली आहे. आजही शासनाने आवश्यक ती परवानगी आणि मशिनरी उपलब्ध करून दिल्यास स्वॅबचे नमुने तपासण्यास आम्ही सज्ज असल्याचे रूग्णालय व्यवस्थापनाने ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.
देशात कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. देशात महाराष्ट्र राज्य रूग्ण संख्येत आघाडीवर आहे. गेल्या पावणेदोन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण सर्वत्र अडकून पडले आहेत. मुंबईत प्रादुर्भाव वाढत चालल्याने अखेर चाकरमान्यांनी गावाकडे परतू लागले आहेत. सध्या कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुळातच कोकणातील हे जिल्हे पुरेशा आरोग्य सोयीसुविधांपासून वंचित राहिले आहेत. कोकणातील या जिह्यांना मुंबई, कोल्हापूर व गोवा यांच्यावर औषधोपचारासाठी अवलंबून रहावे लागते.
चाकरमान्यांच्या वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासनाचे नियोजन पुरते कोलमडून गेले आहे. त्यातच रूग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत चालल्याने व स्वॅब नमुन्यांची संख्याही वाढल्याने अखेर मिरज येथील लॅबवर ताण येऊन त्यांनीही स्वॅब नमुने तपासणीस नकार दिला आहे. त्यामुळे सध्या प्रशासन सैरभैर झाले असून चाकरमान्यांची तपासणी न करताच त्यांना घरी पाठवले जात आहे. या संदर्भात खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून डेरवण रूग्णालयातच टेस्टींग लॅब सुरू करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱयांनीही यापूर्वीच डेरवण रूग्णालयात लॅब सुरू करण्याबाब विनंती केली आहे. यासंदर्भात येथील डेरवण रूग्णालयाकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही यापूर्वीच लॅबची मागणी केली आहे. डेंग्यू रूग्णासह अनेक कारणासाठी अशी लॅब महत्वपूर्ण आहे. आमच्याकडे रूग्णालय, मेडिकल कॉलेज, आवश्यक मनुष्यबळही आहे. केवळ लागणाऱया परवानगी व मशिनरीज उपलब्ध करून दिल्यास आम्ही स्वॅब नमुने तपासणीस तयार असल्याचे सांगण्यात आले.