मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन,मनपात बायोडायजेस्टर प्रकल्पाचे उद्घाटन
प्रतिनिधी / पणजी
कचरा विल्हेवाटीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सर्व शहरे कचरामुक्त बनून गोवा दुर्गंधीमुक्त, स्वच्छ व सर्वांगसुंदर बनण्यास वेळ लागणार नाही, त्यासाठी सर्व पालिकांनी बायोडायजेस्टर सारख्या यंत्रणांचा वापर करावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पणजी मनपा इमारत प्राकारात स्थापन करण्यात आलेल्या रिन्हो बायोडायजेस्टर प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर उदय मडकईकर, पालिका आयुक्त संजीत रॉड्रिग्स, यंत्रणेचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. कपिल कुरेशी, राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच बायरेकचे पी. के. शर्मा आणि अन्य अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
हॉटेलना पुरवणार बायोगॅस
राज्यातील अन्य पालिकांच्या तुलनेत आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पणजी मनपाने चालविलेले प्रयत्न स्तुत्य व कौतुकास्पद आहेत. कचऱयाचे विघटन करून विविध प्रकारे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरात आणलेली आधुनिक यंत्रणा, तसेच कचरा प्रक्रियेतून निर्माण होणाऱया बायोगॅसचा वापर जवळच्या परिसरातील हॉटेलसाठी करून देणे व त्याद्वारे भविष्यात उत्पन्नाचा नवीन स्रोत तयार करणे, आदी उपक्रम स्तुत्य आहेत. आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण बनण्याच्या दृष्टीने उचललेले अनोखे पाऊल आहे. त्याचे इतर पालिकांनीही अनुकरण करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सर्व पालिकांनी पुढाकार घ्यावा
पणजीत पालिका परिसरात अशाप्रकारचे एकूण 12 बायोडायजेस्टर बसविण्यात येणार असून त्यानंतर कचऱयाची समस्या मोठय़ा प्रमाणात सुटणार आहे, त्याशिवाय परिसरात पसरणारी दुर्गंधीही कमी होणार आहे. प्रत्येक पालिका मार्केटात तयार होणाऱया कचऱयावर अशाप्रकारे प्रक्रिया झाल्यास गलिच्छता व दुर्गंधीपासून मुक्ती मिळणार आहे. त्यासाठी सर्व पालिकांनी पुढाकार घ्यावा, त्यांना सर्व आवश्यक मदत करण्यास सरकार तयार असेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
पालिका आयुक्त संजित रॉड्रिगीश यांनी स्वागत व सुत्रसंचालन केले. आत्मनिर्भर भारत योजनेखाली मेक इन इंडियातून या बायोडायजेस्टरची निर्मिती करण्यात आली असून हे एक पेटंटेड उत्पादन असल्याचे सांगण्यात आले. या यंत्राच्या प्रायोगित वापरादरम्यान निर्माण झालेले बायो तसेच द्रव खत राज्यातील दोन शेतकऱयांना भेट देण्यात आले.
महापौर उदय मडकईकर यांनी आपल्या भाषणातून मनपाने कचरामुक्तीसाठी घेतलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. केंद्र सरकारच्या योजनेद्वारे मिळालेल्या सुमारे 2.5 कोटी निधीतून पालिका क्षेत्रात वेगवेगळ्या क्षमतेचे एकूण 12 बायोडायजेस्टर बसविण्यात येणार असून त्यातील सहा स्थापन करण्यात आले आहेत. तीन ठिकाणी काम पूर्ण झाले असून त्यातीलच एका प्रकल्पाचे आज उद्घाटन होत असल्याचे ते म्हणाले.