वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या सीमेवर सुरू असणाऱया शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या कॅनडाच्या पंतप्रधानांच्या कृतीचा जाब विचारण्यासाठी या देशाचे भारतातील उच्चायुक्त नादिर पटेल यांना केंद्र सरकारने पाचारण करण्याची कठोर कृती केली आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्यांची ही कृती सर्वथैव आक्षेपार्ह आणि निदंनीय आहे, असे भारताच्या विदेश व्यवहार विभागाने पटेल यांना सुनावले.
भारताच्या शेतकरी आंदोलनाला मी समर्थन देतो, असे विधान कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले होते. त्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली होती. केंद्र सरकारने ट्रुडो यांच्या या बेजबाबदार वक्तव्याचा तत्काळ निषेध केला होता. अशा तऱहेच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे दोन्ही देशांचे संबंध तणावग्रस्त होतील याची जाणीवही करून देण्यात आली, अशी माहिती विदेश विभागाच्या प्रवक्तांनी दिली.
शुक्रवारी कॅनडाच्या उच्चायुक्तांना विदेश व्यवहार विभागाच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले. त्यांच्याकडे ट्रुडो यांच्या वक्तव्यासाठी कठोर शब्दात निषेध नोंदविण्यात आला. या संबंधी भारताच्या तीव्र भावना त्यांच्या कानावर घालण्यात आल्या. तसेच भविष्यकाळात जबाबदारीने व्यक्तव्य केले जाईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. उच्चायुक्तांनी भारताचा निषेध ट्रुडो यांच्यापर्यंत पोहचविण्यात येईल असे प्रतिपादन केले.