वृत्तसंस्था/ लाहोर
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीची स्थिती बिकट होत असून या स्पर्धेवरही साशंकतेचे सावट निर्माण झाले आहे.सदर स्पर्धा बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना खेळविण्याचा प्रयत्न झाला तर या स्पर्धेचे आकर्षण संपुष्टात येईल, असे प्रतिपादन पाकचा सलामीचा फलंदाज इमाम उल हकने व्यक्त केले आहे.
कोरोना व्हायरस महामारीने संपूर्ण जगातील सर्व हालचाली पूर्णता ठप्प झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडास्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र क्रिकेट हंगामाला फेर सुरूवात करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रयत्न चालू आहेत. आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. या स्पर्धेला अद्याप तब्बल सहा महिन्यांचा कालावधी बाकी आहे. कोरोना व्हायरस परिस्थितीमध्ये सुधारणा होवू शकेल दरम्यान स्पर्धा आयोजकांनी ही स्पर्धा बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना खेळविण्याचा विचार सुरू केला आहे. जर ही स्पर्धा अशा पद्धतीने खेळविली गेली तर या स्पर्धेचे आकर्षण संपुष्टात येईल, असे स्पष्टीकरण इमाम उल हकने दिले आहे. ऑस्ट्रेलियातील ही महत्त्वाची स्पर्धा 18 ऑक्टोबर हे 15 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. पाक क्रिकेट मंडळातर्फे इमाम उल हकचा गौरव करण्यात आला. त्यावेळी त्याने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी बोलताना आपले वरील मत व्यक्त केले.