गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी-कोरोना यांचा लपंडाव : हॅम्लेटलासुद्धा पडले नसतील इतके प्रश्न आता मुलांच्या पालकांना
प्रतिनिधी /बेळगाव
शाळा सुरू की बंद? वर्ग होणार की नाहीत?, ऑनलाईन की ऑफलाईन?, पहिली ते नववी की फक्त दहावी?, हॅम्लेटलासुद्धा पडले नसतील इतके प्रश्न सध्या पालकांना पडले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी आणि कोरोना यांचा लपंडाव सुरू आहे. कोरोनामुळे इतर कोणत्याही क्षेत्राला आर्थिक फटका जरूर बसला असेल, परंतु शिक्षण क्षेत्राला प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मात्र मानसिक फटका जोरदार बसला आहे.
सततच्या ‘होय’ आणि ‘नाही’च्या सीमारेषेवर विद्यार्थी अडकून पडले आहेत. कोरोनापाठोपाठ आलेला ओमिक्रॉन कधी जाईल, याची शाश्वती नाही. यापुढे कोणतेही विषाणू उद्भवणार नाहीत, याची कोणतीही हमी नाही. अशा परिस्थितीत शाळा सुरू ठेवाव्यात की न ठेवाव्यात याची एक सतत संभ्रमावस्था विद्यार्थ्यांनी अनुभवलीच, परंतु खुद्द प्रशासनाने आणि सरकारनेही ती अनुभवली.
जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती म्हणजेच पूर, अतिवृष्टी, वाढत्या उन्हाचा तडाखा अशाप्रसंगी प्रामुख्याने पालकांना प्रश्न पडतो तो मुलांना शाळेत पाठविण्याचा. शाळेत न पाठविल्यास अभ्यास बुडतो. पाठविल्यास आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे ‘टू-बी ऑर नॉट टू-बी’ अशा ‘होय-नाही’च्या मध्यावर पालकही अडकून पडले आहेत.
दुर्दैवाने आपल्याकडे आजही कौशल्यापेक्षा गुणांवर, टक्केवारीवर बुद्धिमत्ता ठरते. नवीन शैक्षणिक धोरण यामध्ये बदल करू शकेल, अशी आशा करण्यास वाव आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत शिक्षण क्षेत्राची आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची जी हेळसांड झाली आहे ती लवकर भरून येईल, अशी शक्मयता कमी आहे. दुर्दैवाने शाळा बंद म्हणताच आता अभ्यासाचे काय? असे म्हणून गुणांच्या टक्केवारीमागे धावणारे पालक मुलांना वेठीस धरतात. ज्यांना रोजंदारीवर गेल्याशिवाय पोट भरणे शक्मय नाही असे पालक नकळत एक निःश्वास सोडतात. कदाचित एखादे मूल हाताशी येऊ शकते, अशीही आशा त्यांना आहे.
शाळांच्या वेळा, दप्तराचे ओझे, जीवघेणा बसप्रवास, रिक्षामध्ये होणारी गर्दी, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी वाहतूक व्यवस्था नसणे, घोकंपट्टीवरच भर देणारे शिक्षक अशा अनेक यंत्रणांशी विद्यार्थ्यांचा चिमुकला जीव लढत असतो. परंतु आपल्याला त्याची कल्पना येत नाही. ऑफलाईन वर्ग होत नसतील तर ऑनलाईन वर्गाचा पर्याय पुढे येतो. परंतु दुर्दैवाने विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसन लागू शकते. त्याही पुढे त्यांच्या डोळय़ांच्या तक्रारी अलीकडच्या काळात वाढल्या आहेत, हे वास्तव आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीच आपण हा निर्णय घेतला, असे प्रशासन आणि सरकार स्पष्ट करते. मात्र, आता सतत तळय़ात-मळय़ात करणे विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने आणि शिक्षणाच्यादृष्टीनेही परवडणारे नाही. त्यासाठी दोन सत्रांमध्ये कमी विद्यार्थ्यांच्या संख्येने शाळा भरवावी लागेल. पुन्हा कामाचा बोजा वाढेल, म्हणून आतापासूनच शिक्षक त्याला विरोध करू शकतील किंवा नाके मुरडतील. परंतु आज ना उद्या हा पर्याय नक्कीच पुढे येणार आहे.
शाळांचा बाह्य कायापालट उपयोगी नाही
दीर्घकाळानंतर शाळा सुरू करताना सरकारने शाळेमध्ये सॅनिटायझेशन केले जाईल, कोविड-19 चे सर्व नियम पाळले जातील, असे स्पष्ट केले. परंतु बहुसंख्य शाळांनी केलेल्या दुर्लक्षाची परिणती शाळेत कोरोनाचा शिरकाव होण्यामध्ये झाली. शिक्षक विद्यार्थी नव्हे तर समाज घडवितात. आजची मुले ही उद्याचे सुजाण नागरिक असे केवळ म्हणून चालणार नाही. शाळांचा बाह्य कायापालट उपयोगी ठरणार नाही.
सद्यस्थितीत शाळा बंद असताना परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन मुलांचा अभ्यास चुकणार नाही, यासाठी काही शिक्षकांची मदत घेऊन गटागटाने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे अपेक्षित आहे. मोबाईलपेक्षा प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव अधिक प्रभावी ठरतो. हाच पर्याय निवडायला हवा असेही नाही. अन्य पर्यायही पुढे येऊ शकतात. पण किमान पाच विद्यार्थ्यांची जबाबदारी एका व्यक्तीने घेतल्यास बराच फरक निश्चित पडू शकतो.
सरकार-प्रशासनाच्या निर्णयाबद्दल पालकांमध्ये नाराजी
दरम्यान, सरकार आणि प्रशासन यांच्या निर्णयाबद्दल पालकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. लहान मुलांसाठी अद्याप लस उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालक राजी नाहीत. पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरू करावेत, म्हणजे मुलांच्या आरोग्याची पालकांना चिंता राहणार नाही आणि शाळांवरही ताण येणार नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. सरकारने शाळा सुरू केल्या तरीसुद्धा पालक संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेऊन मुलांना शाळेत पाठविण्यास तयार होत नाहीत, हे वास्तव आहे.
आपल्याला काय वाटते? तरुण भारतकडे व्यक्त करा
सततच्या तळय़ात-मळय़ात भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सरकार आणि प्रशासन हतबल आहे. परंतु त्यातूनही सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे. याबाबत चर्चा होणे भाग आहे. आपल्याला काय वाटते यासाठी आपली मते तरुण भारत 9341473947 या
व्हॉट्सऍप क्रमांकावर थोडक्मयात लिहून पाठवावीत.