ग्रामविकासमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचे स्पष्ट संकेत : प्रशासक नेमणार
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील तालुका पंचायती आणि जिल्हा पंचायतींचा कार्यकाळ मे अखेरीस संपुष्टात येणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे तालुका, जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कालावधी संपणाऱया जिल्हा पंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री के. ए. ईश्वरप्पा यांनी दिली आहे.
विधानसौध येथे सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तालुका आणि जिल्हा पंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा अधिकृत निर्णय घेऊन राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात येइल, असे ते म्हणाले.
राज्यातील तालुका आणि जिल्हा पंचायतींसाठी मे अखेरपुर्वी निवडणूक घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने चालविली होती. शिवाय निवडणूक आयुक्तांनी देखील निवडणुकीला विलंब होणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन सध्या निवडणुका घेणे उचित ठरणार नसल्याचे मत व्यक्त झाले आहे. यापुर्वी ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव इतका नव्हता. ग्रामीण भागात 2.5 लाख जण निवडणूक प्रकियेत सहभागी होतात. त्यामुळे सध्या निवडणुका घेण्याऐवजी प्रशासक नेमण्याचा सल्ला सरकारला देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.