वाहनधारकांसाठी रस्ता बनला मृत्यूचा सापळा : खड्डय़ांमध्ये वाहने अडकण्याचे प्रकार : शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथील खड्डे भरण्याकडे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. मात्र, हेच खड्डे आता जीवघेणे बनले असल्याने वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. अशा धोकादायक खड्डय़ांची दखल जिल्हा प्रशासन घेणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहर आणि उपनगरांतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेच्यावतीने कोटय़वधीचा निधी खर्ची घातला जातो. पण प्रत्यक्षात खर्ची घालण्यात आलेल्या निधीप्रमाणे रस्त्यांची देखभाल केली जात नाही. यामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याने वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तिसरे रेल्वेगेट परिसरात खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. काहीवेळा दुचाकी वाहनधारक पडत असल्याने धोकादायक बनले आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने खड्डे बुजविण्याची गरज आहे. पण याकडे मनपा अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. या ठिकाणी मोठा अनर्थ घडण्याची प्रतीक्षा महापालिकेचे अधिकारी करीत आहेत का, असा प्रश्नही नागरिक करीत आहेत.
बहुतांश रस्त्यांची चाळण
बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजविण्याची तसदी महापालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतली नाही. परिणामी रस्ते धोकादायक बनले आहेत. हनुमाननगर येथील गणपती मंदिर ते सहय़ाद्रीनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण प्रत्येक वर्षी करण्यात येते. पण रस्त्याची दुरवस्था जैसे थे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की खड्डे पडण्यास प्रारंभ होतो. हेच खड्डे मोठय़ा आकाराचे होऊन धोकादायक बनतात. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. रस्त्यावर खड्डे पडल्याने डांबरीकरण करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. पण सुस्तावलेल्या महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आता पाऊस असल्याने रस्त्याचे डांबरीकरण करता येत नसल्याची सबब सांगत दुर्लक्ष करण्यात येत आहे.
वाहनधारकांचा जीव धोक्यात
वास्तविक पाहता एप्रिल-मे महिन्यांदरम्यान डांबर घालून खड्डे बुजविणे शक्य होते. पण याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला होता. रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रस्त्यावर अपघात घडून नागरिकांचे बळी जात असल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. बहुतांश वेळा खड्डे चुकविण्यास जाऊन दुचाकी वाहनांचे अपघात घडत असल्याच्या तक्रारी होत आहेत. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत.