काम जलदगतीने पूर्ण करून रस्ता खुला करण्याची गरज : रेल्वे प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
तिसऱया रेल्वे गेटवर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र सदर काम संथगतीने सुरू असून रॅम्प निर्माण करण्याचे काम रखडले आहे. तसेच रॅम्प उभारणीसाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली आहे. पण हे काम जलदगतीने पूर्ण करून रस्ता खुला करणे आवश्यक आहे. मात्र याकडे रेल्वे प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील विविध रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तिसऱया रेल्वे गेटचे काम सुरू करून तीन वर्षे झाली मात्र अद्यापही अर्धवटच आहे. एक वर्षाच्या आत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे हे काम रखडले आहे.
काही महिन्यांपूर्वी उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. रेल्वे मार्गादरम्यानच्या स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पुलाच्या दुतर्फा रॅम्प निर्माण करण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. पण हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून अद्यापही अर्ध्यावरच आहे. त्यामुळे उड्डाणपुलाची उभारणी कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.