प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज येथे महावितरणच्या तुटलेल्या 33 केव्हीच्या विद्युतभारित तारेस झालेल्या स्पर्शाने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली.
भोरज येथील प्रकाश गोपाळ घोसाळकर (55) व वंदना प्रकाश घोसाळकर (51) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. हे दाम्पत्य कामानिमित्त दुचाकीने लोटे येथे गेले होते. लेटे येथील काम आटोपून घरी परतत असताना महामार्गावर तुटलेल्या वीज वाहिनीस त्यांचा स्पर्श झाला. यात ते दोघेही जागीच गतप्राण झाले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीने सरपंच विशाल घोसाळकर व महावितरणसह पोलीस यंत्रणेला खबर देण्यात आली. महावितरणने तातडीने वीजपुरवठा खंडित केला. याबाबतची खबर मिळताच प्रांत अधिकारी अविशकुमार सोनोने, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे, जि.प.सदस्य अरूण कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले.
रविवारी रात्री चक्रीवादळासह जोरदार पावसाने महावितरणला मोठा दणका दिला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी विद्युतखांबांसह वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱयांनी सोमवारी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. मात्र, बोरज येथे तुटलेल्या वीजवाहिनीमुळे घोसाळकर दाम्पत्यांचा हकनाक बळी गेला आहे. महावितरणच्या या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.