हातात छत्र्या घेऊन आटोपले तुळशी विवाह
प्रतिनिधी /फोंडा
वडली दिवाळी म्हणजेच तुळशीच्या लग्नाला हिवाळय़ातील अंग गारठणाऱया थंडीला सुरुवात व्हायची. यंदा मात्र भर पावसात छत्र्या घेऊन तुळशीचे लग्न लावण्याची पाळी गोवेकरांवर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तुळशी विवाहाची तयारी व लग्न या साऱया उत्साहाचा हिरमोड झाला आहे.
फोंडा तालुक्यात सोमवार व मंगळवार असे दोन दिवस बहुतेक घरांमध्ये तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले. मात्र विजांच्या गडगडासह गेले दोन दिवस जोरदार पाऊस कोसळल्याने धावपळीत हा सोहळा आटोपता घ्यावा लागला. तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी, सारवलेल्या अंगणात रांगोळी, वृंदावनासमोवताली आकर्षक सजावट अशा थाटामाटात तुळशीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून सायंकाळी व पावसाने लावलेल्या हजेरीमुळे लोकांना तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी अर्धवटच सोडावी लागली.
घाई गडबडीत सजावट करुन लग्न सोहळा आटोपता घ्यावा लागला. मंगळवारच्या दिवशी तर पावसाने कहरच केला. सायंकाळी 5 वा. पासूनच जोरदार हजेरी लावल्याने तयारी सोडाच हातात छत्र्या घेऊन लग्नसोहळे घाई गडबडीत उरकावे लागले. सुहासिनींकडून पेटवली जाणारी जोडवी व अन्य उत्साहाचाही हिरमोड झाला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला वरुण राजाने अशी जोरदार हजेरी लावल्याने दिवाळीच्या स्वागतासाठी गुंतलेली लहान मुले व युवावर्गासह सर्वांनाच आपला उत्साह आवरता घ्यावा लागला होता. घरोघरी लक्ष्मी पुजनाची तयारी सुरु असतानाच, सुसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस आल्याने या उत्सवावरही परिणाम झाला होता. फोंडा तालुक्यातील बऱयाच गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने काळोखात पणत्यांचे दिवे लावून लक्ष्मी पूजा आटोपती घ्यावी लागली. आता तुळशी लग्नाच्या उत्साहावरही पावसाने पाणी फेरले आहे.