राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असतानाच नाटय़मय घडामोड घडली असून त्यांनी सभागृहातच राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची स्तुती केल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही बळावली आहे. बंगालमधील हिंसाचार पाहून माझी घुसमट होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच तृणमूलच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांची चिंता वाढलेली असतानाच त्रिवेदी यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यसभेत बोलताना दिनेश त्रिवेदी यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरू असल्याचा उल्लेख केला. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. आज माझ्या आयुष्यात ती वेळ आली आहे. मी आज राज्यसभेतून राजीनामा देत आहे. मला राज्यसभेत पाठवल्याबद्दल मी माझ्या पक्षाचा आभारी आहे. पण राज्यात हिंसाचार सुरू असूनही काहीच करू शकत नसल्यामुळे आपली घुसमट होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपण एक जबाबदार व्यक्ती असूनही काहीच करु शकत नाही तर मग राजीनामा दिला पाहिजे, असे माझे मन सांगत आहे, असेही ते पुढे म्हणाले. तसेच बंगालच्या लोकांसाठी आपण काम करत राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
पंतप्रधान मोदींचे केले कौतुक
गेल्या वर्षभरात कोरोना संसर्गाच्या काळात भारताने चांगली कामगिरी केली. या लढय़ाचे श्रेय पंतप्रधान मोदींनी 130 कोटी नागरिकांना दिले असले तरी नेतृत्त्व सक्षम असल्यामुळेच कोरोनाशी लढा यशस्वी झाल्याचे स्पष्ट करत दिनेश त्रिवेदी यांनी मोदींचे कौतुक केले.