प्रतिनिधी/ रत्नागिरी
तोटय़ातील एसटी महामंडळाला सुस्थितीत आणण्यासाठी विविध उपायांवर विचार सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून वयाची पन्नाशी गाठलेल्या अधिकारी व कर्मचाऱयांना स्वेच्छासेवानिवृत्ती देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. याबाबतच्या परिपत्रकामुळे महामंडळाच्या 27 हजारांहून अधिक कर्मचाऱयांपुढे पेच निर्माण झाला आहे. यामध्ये रत्नागिरी विभागातील सुमारे 800 कर्मचाऱयांचा समावेश आहे. कोणत्याही गाजावाजाशिवाय सुरू झालेल्या या कार्यवाहीमुळे एसटी कर्मचाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.
वयाची पन्नाशी गाठलेल्या एसटी कर्मचाऱयांनी स्वेच्छासेवानिवृत्ती घ्यावी, यासाठी महामंडळाने तयारी सुरू केली आहे. या कर्मचाऱयांनी संमतीपत्र भरून याला होकार द्यावा, यासाठी समन्वयाची जबाबदारी महामंडळाच्या अधिकाऱयांवर सोपवण्यात आली आहे. महामंडळाचे महाव्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. महामंडळ स्वेच्छानिवृत्ती योजना राबवणार असल्याच्या चर्चेवर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
हे परिपत्रक विभाग, आगार, घटक स्तरावरील सूचनाफलकांवर लावले जाणार आहे. या निर्णयानुसार 50 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱयांचा ही योजना समजावून सांगितली जाणार आहे. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2020 या काळात 50 वर्षे पूर्ण करणारे कर्मचारी व अधिकारी यांचाही यामध्ये विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी संमतीपत्रही भरून घेतले जाणार आहे. मात्र संमतीपत्र भरुन दिले म्हणजे स्वेच्छानिवृत्ती मंजूर झाली असे समजण्यात येऊ नये, असे म्हणत कर्मचाऱयांच्या मनात संशयाचे वातावरणही यातून तयार केले जात आहे.
जिह्यातील 813 कर्मचारी योजनेच्या कक्षेत
रत्नागिरी आगारात एकूण 775 अधिकारी, कर्मचारी या योजनेच्या कक्षेत येणार आहेत. याबरोबरच जुलै ते डिसेंबर या काळात 50 वर्षे पूर्ण करणारे आणखी 38 कर्मचारीही यामध्ये दुसऱया टप्प्यात समाविष्ट होणार असल्याने ही संख्या 813 होणार आहे. यामध्ये चालक व वाहकांची संख्या सर्वाधिक आहे. मुळातच वाहक-चालकांची संख्या अपुरी असताना एवढय़ा संख्येने सेवानिवृत्ती झाल्यास विभागाचा गाडा कसा चालणार, असा प्रश्नही विचारला जात आहे. कोरोनाशी दोन हात करताना थकलेल्या महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱयांसमोर आणखी एक प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे.
रत्नागिरी विभागाची कार्यवाही सुरु
रत्नागिरी विभागीय कार्यालयाकडून यासंदर्भातील कार्यवाही गुरुवार 10 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात सर्व आगारांना याबाबतचे अर्ज पाठवले जाणार असून, सेवानिवृत्ती घेऊ इच्छिणाऱया अथवा नाकारणाऱया कर्मचाऱयांकडून अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी विभागीय स्तरावर छाननी होऊन त्याचा अहवाल महामंडळाच्या मुख्य कार्यालयात पाठवणार असल्याचे विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले. 31 डिसेंबरपर्यंत या माहितीचे आगार व प्रवर्गनिहाय संकलन संकेतस्थळाच्या माध्यमातून केले जाणार आहे. राज्यस्तरावर एकत्र होणाऱया आकडेवारीवरून पुढील कार्यवाही तातडीने करण्यासाठी महामंडळ सज्ज असल्याचे समजते.
कर्मचाऱयांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह
या योजनेविषयी कर्मचाऱयांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पगार बंद होईल, गरजेच्यावेळी कुठल्याही संस्थेकडून कर्ज उपलब्ध होणार नाही. पेन्शन नसल्याने मिळालेल्या पैशातूनच गुजराण करावी लागेल. घरातील कार्यप्रसंग, शिक्षण करण्याची जबाबदारी याच वयात पार पाडावी लागते. अशावेळी योजना स्वीकारायची की नाकारायची, याविषयी वेगवेगळी मते मांडली जात आहेत. कर्मचारी संघटनांशी कोणतीही चर्चा न करता त्यांची मते विचारात न घेता मागील दाराने ही योजना आणली जात असल्याबद्दल काही कर्मचाऱयांनी नाराजी व्यक्त केली आहे. सातत्याने रखडणारे पगार व अन्य अडचणींचा सामना करण्यापेक्षा जे मिळेल ते घेऊन यातून बाहेर पडणे चांगले, असा विचारही काही व्यक्त करू लागले आहेत.