ऑनलाईन टीम / मुंबई :
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंददरम्यान मुंबईत झालेली दगडफेक वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. काही समाजकंटकांकडून हे आंदोलन हिंसक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी हे चेहरे लपविणारे शोधून काढावेत, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान ते बोलत होते. आंबडेकर म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यात उत्फुर्त प्रतिसाद मिळत असून, 35 संघटनांनी यात सहभाग घेतला आहे. मात्र, काही समाजकंटकांकडून हे आंदोलन हिंसक केले जात आहे. मुंबईत बसवर दगडफेक करणारे कार्यकर्ते वंचितचे नाहीत. त्यामागचे चेहरे पोलिसांनी शोधावेत.
तसेच हिंदू-मुस्लीम दंगल घडविण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शांततापूर्ण बंद पाळण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.