- मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना
ऑनलाईन टीम / मुंबई :
अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी तसेच विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे, अशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत.
या चक्रीवादळाचा प्रभाव विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असे, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी चारही जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या सूचना केल्या.
लक्षद्वीपजवळ अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) तयार झाले असून, शनिवारी त्याचे तौत्के चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. हे चक्रीवादळ अतितीव्र स्वरूपात 17 मेच्या मध्यरात्री गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 15 ते 17 मेदरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मोठ्या पावसाचा इशाराही आयएमडीने दिला आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तौत्के चक्रीवादळ तयार होऊन पुढील 24 तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तर-वायव्येकडे सरकणार असून, 17 मे रोजी रात्री 9 ते 12 च्या दरम्यान ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहचण्याचा अंदाज आहे. गुजरातजवळ अतितीव्र स्वरूपात असणाऱ्या चक्रीवादळाच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी 160 किलोमीटरपर्यंत पोहचू शकतो.