नगरविकास सचिव डॉ.थॉमस यांचे स्पष्टीकरण : गुरुवारी रात्रीच्या परिस्थितीचा अहवाल सादर,आज पुन्हा होणार सुनावणी
प्रतिनिधी / पणजी
गोवा राज्याचे नगरविकास खात्याचे सचिव डॉ. तारिक थॉमस गुरुवार दि. 13 रोजी पूर्ण रात्र गोमेकॉतील कोरोना वॉर्डमध्ये निरीक्षणासाठी थांबले. त्यांच्या डोळय़ादेखत 13 रुग्णांनी प्राण सोडला, पण ऑक्सिजनचे प्रमाण पूर्ण रात्रभर कमी झाले नव्हते. त्यामुळे मृत्यूस ऑक्सिजन पुरवठा हे एकमेव कारण नव्हते, असे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर काल शुक्रवारी स्पष्ट केले आहे.
गुरुवारी रात्री 10 वाजता नगरविकास सचिव डॉ. तारिक थॉमस गोमेकॉच्या कोविड वॉर्डमध्ये पोहचले. पी.पी.ई कीट परिधान करून त्यांनी पहाटे 5.45 वा. पर्यंतच काळ वॉर्डमध्ये घालविला. आरोग्य खात्याचे सचिव रवी धवन यांनी रात्री गोमेकॉच्या तळघरात असलेल्या ऑक्सिजन पुरवठय़ावर पूर्णरात्र नजर ठेवली. पहाटेपर्यंत ट्रॉली बदलावी लागली नाही. ऑक्सिजनचा दाबही कमी झाला नाही. तरीही पहाटे 2 ते 6 वा. पर्यंत 13 रुग्ण दगावले.
ऑक्सिजन कमतरतेची एकही तक्रार नव्हती
गुरुवारी 24 तास निगरानी करण्यात आली होती, अशी माहिती आरोग्य सचिवांनी उच्च न्यायालयाला दिली आहे. दि. 13 मे रोजी सकाळी 8 ते शुक्रवार दि. 14 मे रोजी सकाळी 8 वा. पर्यंत 62 ऑक्सिजन ट्रॉली लावण्यात आल्या होत्या. त्या व्यतिरिक्त 600 जंबो सिलिंडर, 47 छोटे सिलिंडर 46 खाटांना सोडण्यात आले होते. त्या व्यतिरिक्त 263 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर होते. ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याची गुरुवारी एकही तक्रार नव्हती, अशी माहिती आता मुंबई उच्च न्यायालयासमोर उघड करण्यात आली आहे.
केंद्राकडून 323 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर पोहोचले
केंद्र सरकारने पाठवलेले 323 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर पोहोचले आहेत. पैकी 263 गोमेकॉला देण्यात आले. त्यातील 163 कोविड वॉर्डमध्ये तर 100 सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये वापरण्यात आले. फोंडय़ातील आयडी इस्पितळात 30, म्हापशातील जिल्हा इस्पितळात 20 व डिचोली येथील केशव सेवा केंद्रात 10 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर पाठवण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
कोल्हापूरहून आले आठ ट्रक्टरचालक
ऑक्सिजन ट्रॉली या ट्रक्टरद्वारेच गोमेकॉपर्यंत पोचवल्या जातात. 24 तासात 60 पेक्षा अधिक ट्रॉली वाहून न्याव्या लागतात. ट्रक्टरचालक नसल्याने ऑक्सिजन पुरवठा करणाऱया कंपनीवर ताण येत होता. शुक्रवारी आणखी 8 ट्रक्टर चालक कोल्हापूरहून आले. त्यांच्या सोबत दोन हाय पावर ट्रक्टरही पाठवण्यात आले आहेत.
ऑक्सिजन टाकी उभारण्याच्या कामाला सुरुवात
गोमेकॉ परिसरात ऑक्सिजनची मोठी टाकी उभारण्याच्या कामास प्रारंभ झाला असून हे काम सोमवार दि. 17 मे पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाला काल शुक्रवारी देण्यात आली आहे. मेसर्स प्रेक्स एअर इंडिया प्रा. लि. या आस्थापनाला सदर काम देण्यात आले असून युद्धपातळीवर हे काम चालू आहे. ही एल. एन. ओ. टँक कार्यरत झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठय़ाचा प्रश्न संपणार आहे. केंद्र सरकार गोव्याला रोज 20 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करत होते. हा कोटा वाढवण्यात आला असून शुक्रवारपासून 46 मेट्रिक टन ऑक्सिजन यायला सुरुवात झाल्याचे आरोग्य उच्च न्यायालयाला सरकारने कळविले आहे.
गोमेकॉत दुसरा डय़ुरा सिलिंडर कार्यान्वित
मेसर्स स्कूप प्रा. लि. या आस्थापनाने गोमेकॉत डय़ुरा सिलिंडर बसवले होते. गुरुवार 13 रोजी संध्याकाळी 6 वा. पासून ते कार्यान्वित झाल्याची माहिती उघड करण्यात आली आहे.
शव व रुग्ण वाहिकांचे दर निश्चित
रुग्ण वाहिका तसेच शव वाहिकांकडून लूट होऊ नये म्हणून वाहन दर निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे.
पुढील सुनावणी आज किंवा सोमवारी
मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केलेले उत्तर समाधानकारक वाटल्यास सुनावणी सोमवारी घेतली जाईल अन्यथा आज शनिवारी होईल, असे न्यायपीठाने शुक्रवारी सुनावणी तहकूब करताना स्पष्ट केले होते.
ऑक्सिजन टाकी उभारणे सुरू
बांबोळी येथील गोमेकॉत 20,000 लीटरची मेडिकल ऑक्सिजन टाकी उभारण्याचे काम चालू करण्यात आले आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
गोमेकॉत आक्सिजनअभावी दररोज कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडत असल्याने तसेच ऑक्सिजनची ट्रॉली पद्धत जीवघेणी ठरल्याने उशिरा जाग आलेल्या सरकारने आता तेथेच ऑक्सिजनची टाकी बसवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यास किती दिवस लागणार आणि ती टाकी कधी कार्यान्वित होणार, याबाबत सध्यातरी कोणीच अंदाज बांधू शकत नाही. ऑक्सिजनचा सलग पुरवठा होत नसल्याने गोमेकॉत अनेक कोरोना रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहेत. अनेक रुग्णांना त्याचा फटका बसत असून त्यांचे बळी जात आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून ती केली नाही, तर हे बळी असेच जात राहतील, अशी चिन्हे आहेत. ते बळी रोखण्यासाठी उपाय करा म्हणून न्यायालयानेदेखील सांगितले होते. पण सरकारने अद्यापतरी उपाय न केल्याने बळी जाण्याचे प्रकार चालूच आहेत. आता नवीन टाकी बसवून ती सुरू केल्यानंतर तरी बळींचे सत्र थांबेल काय ? याचे उत्तर कालांतराने मिळेल.