अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 31 जुलै 2021, सकाळी 10.00
●मृत्यूमध्ये सारीचे कारण ●वृद्धांची मृतांमध्ये जास्त संख्या ●बाधितांचा अहवाल यायला लागतोय उशीर ●उगाच प्रशासन वाढवतेय भीती ●बाधितांमध्ये कराड, सातारा, खटाव अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय ●शुक्रवारी दिवसभरात 12012 टेस्ट तर 842 बाधित
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. आढळून येणाऱ्या बाधित रुग्णामध्ये सातारा, कराड, खटाव हे तीन तालुके अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय असे आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जो मृत्यू आकडा दाखवला जात आहे. त्यामध्ये मागच्या तारखेच्या आकड्यांचा समावेश आहे. त्यामध्ये कोरोनाऐवजी सारीच्या लक्षणाचा उल्लेख आढळून येत आहे. मृतांमध्ये जेष्ठ व्यक्तींची संख्या जास्त आहे. प्रशासन मृत्यूचा आकडा मागचा दाखवून भीती वाढवत आहे. दरम्यान बाधितांचा अहवाल यायला उशीर लागत असल्याने बाधितांना उपचार घेण्यात दिरंगाई होत आहे. काल दिवसभरात 12012 एवढ्या तपासणी करण्यात आल्या असून, 842 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून, पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के आहे.
सातारा, कराड पाठोपाठ दुष्काळी खटाव तालुका
सातारा जिल्ह्यातील कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून येणारे तालुके सातारा, कराड हेच आहेत. त्या तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात कोरोना होऊ नये, म्हणून प्रत्येक जण काळजी घेत असला तरी कोरोनाची बाधा कशी होते हे समजत नाही. मास्क, सानिटायझर यांचा वापर केला तरी रुग्ण बाधित होत आहे. दरम्यान, दुष्काळी खटाव तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे. फलटण तालुका चौथ्या क्रमांकावर असून, बाधित आढळून येण्याचे प्रमाण काहीसे दुष्काळी तालुक्यातील ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वरमध्ये काल केवळ तीन जण बाधित आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एकमेव तालुक्यात सगळ्यात कमी बाधित आहेत.
मागच्या तारखेचे मृत्यूचे आकडे
गेल्या तीन दिवसांपासून दाखवण्यात येत असलेले मृत्यूचे आकडे हे मागच्या तारखेचे आहेत. त्यामध्ये सारीने दगवलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. मृतांमध्ये फलटणचा पहिला तर कराडचा दुसरा क्रमांक काल लागत होता. त्यामुळे जिल्हावासियांच्या मनात प्रशासनाकडून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.
शनिवारपर्यंत एकूण नमूने – 14,09,288, एकूण बाधित – 219009, घरी सोडण्यात आलेले – 204652, मृत्यू – 5281, उपचारार्थ रुग्ण-10700