अजूनही पालवीचे प्रमाण अत्यल्प : वातावरणातील बदल परिणामकारक : काही भागात फवारणीस प्रारंभ
विजय पाडावे, मनोज पवार / रत्नागिरी, दापोली
खऱया अर्थाने आंबा हंगामाला सप्टेंबर मध्यापासून सुरुवात होते. सप्टेंबरमध्ये आलेल्या पालवीला ऑक्टोबरमध्ये मोहोर येण्यास सुरुवात होते. मात्र यावर्षी पावसाच्या परतीचा प्रवासही लांबला होता. गेल्या 3-4 दिवसांपासून रत्नागिरीत गुलाबी थंडीची लहर जाणवू लागली आहे. त्यामुळे हापूसला पोषक वातावरणनिर्मिती होतेय. काही झाडांवर तुरळक मोहोर दिसू लागला असला तरी वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतींमध्ये पालवीचे प्रमाण अल्प दिसत आहे. वातावरणात होणाऱया बदलावर पुढील चित्र ठरणार असल्याचे बागायदारांकडून सांगितले जात आहे.
जगप्रसिद्ध हापूस आंब्याला गेल्या 10 वर्षांपासून बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. वर्षागणिक या बदलांमुळे हापूसचा हंगाम लांबणीवर जात आहे. अचानक निर्माण होणारी वादळी स्थिती, अवकाळी पाऊस व उष्णतामानातील बदल आंबा पिकांसाठी मारक ठरत आहेत. अनेकदा आंबा हंगाम लांबतो, उत्पादन वाढते, मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने बागायतदारांचे नियोजन विस्कटून जाते. या हंगामात ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरूच राहिल्यामुळे जमिनी अजूनही ओल्या आहेत.
आंबा कलमांना पालवी येण्यासाठी जमिनीला ताण बसण्याची आवश्यकता असते. आंबा झाडाला पाण्याचा, थंडीचा व खाऱया वाऱयाचा असा 3 प्रकारचा ताण बसतो. पाऊस पडल्यामुळे, खारे वारे व थंडी नसल्यामुळे हा ताण बसला नाही. त्याचा परिणाम आंब्याच्या पालवीवर झाल्याने पालवी येण्यास 15 ते 20 नोव्हेंबरची प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र रत्नागिरीत काही भागात आंबा कलमांवर किटकनाशक फवारणीचा शुभारंभ करण्यात आला.
पालवीवर पुढील चित्र अवलंबून राहणार
यावर्षी पावसाचा मुक्काम उशिरापर्यंत राहिला. पण लगेचच थंडीला प्रारंभ झालाय. काही ठिकाणी झाडांवर तुरळक मोहोर दिसू लागला आहे. पण पालवीचे प्रमाण अत्यल्प आहे. पालवीवर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. वातावरणातील बदलांमुळे आंबा हंगामाचे चित्र मागे-पुढे होताना दिसतेय. आता जरी हापूसला पोषक वातावरण तयार झालेले असले तरी वातावरणातील पुढील बदलांवर उत्पादन अवलंबून राहणार आहे.
टी. एस. घवाळी, आंबा बागायतदार-रत्नागिरी
हंगाम लांबण्याची शक्यता
यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये कोकणात तब्बल 10 टक्के जादा पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्य़ाचा कालावधीही लांबला. यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी कोकणात जाणवणारी पाण्याची टंचाई कमी होण्याची शक्यता असली तरी हापूस व रब्बी पिकांचा हंगाम लांबण्याची शक्यता कृषी तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली आहे. पावसाचा हंगाम सप्टेंबर महिन्यात संपतो. यावर्षी ऑक्टोबर महिन्यातही पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे खरीप पीक हातचे गेले. काही भागात धान्यांना पुन्हा मोड आले. देशातून मान्सून परत गेल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने यावर्षीच्या पावसाच्या आकडेवारीची माहिती दिली. यावर्षी कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 4 जिह्यांत सरासरी 3 हजार 274.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. यावर्षी कोकणात तब्बल 10 टक्के जादा पाऊस पडला. हा वाढलेला आकडा साधारण ऑक्टोबर महिन्यातला असल्यामुळे कोकणात पिकणाऱया भात, नाचणी, वरी आदी मुख्य धान्यावर या पावसाचा परिणाम झाला. जादा पाऊस झाल्यामुळे व ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडल्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन आंब्याच्या झाडांच्या मुळांना आवश्यक असलेला ताण ऑक्टोबर महिन्यात मिळालेला नाही. यामुळे यंदा आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणार आहे, असेही तज्ञांनी यासेळी स्पष्ट केले आहे.